दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठा (जेएनयू)च्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर येताच मुंबईतील विद्यार्थ्यांनी त्याचा निषेध केला. जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील विविध संघटना, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक गेट वे ऑफ इंडियाजवळ एकत्र जमले आणि त्यांनी हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शनं केली.
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना पोलिसांनी मंगळवारी सकाळी या आंदोलकांची आझाद मैदानात रवानगी केली आहे. पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानात जाण्याची सूचना केली. मात्र, यावेळी आझाद मैदानात जाण्यासाठी आंदोलकांनी विरोध केला.
Sangramsingh Nishandar, DCP (Zone 1) on protesters(protesting against #JNUViolence) evicted from Gateway of India: Roads were getting blocked and common Mumbaikar and tourists were facing problems. We had appealed to protesters many times,have now relocated them to Azad Maidan pic.twitter.com/aW0gWlKGZj
— ANI (@ANI) 7 January 2020
आंदोलक गेट वे ऑफ इंडियावरच ठाण मांडून होते. त्यावेळी गेट वे परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा होती. परंतु, पोलिसांनी गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलेलं नाही, आझाद मैदानात त्यांची रवानगी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या या आंदोलनात छात्र भारती, जॅक मुंबई आणि इतर सर्व पुरोगामी संघटना, टीस, टीआयएफआर, मुंबई विद्यापीठ या शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थ्यांसह मिठीबाई, सेंट झेविअर्स, रूपारेल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात सामान्य आणि स्थानिक नागरिकांनीही आपला सहभाग दर्शवत या भ्याड हल्ल्याचा निषेध केला.