
ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ऑगस्ट 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून 31 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजेपर्यंत हे वाहतूक निर्बंध लागू राहतील.
सावरकर नगर ते महात्मा फुले नगर या मार्गावरील कामगार नाका कट ते आर. जे. ठाकूर कॉलेज कट दरम्यानच्या रस्त्यावर तात्पुरते निर्बंध लागू करण्यात येणार आहेत.
जलवाहिनी टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात येणार असल्याने या कालावधीत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
कामगार नाक्याहून आर. जे. ठाकूर कॉलेजमार्गे आयमाता चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रतिबंधित मार्गावर प्रवेश करता येणार नाही.
या वाहनांना पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा लागेल—
सावरकर नगर → यशोधन नगर → बस स्टॉप → उजवे वळण → आयमाता चौक
वर्धन नगर आणि यशोधन नगरकडून कामगार नाक्याकडे जाणारी वाहतूक देखील प्रभावित होणार आहे.
या वाहनांना आयमाता चौक येथे प्रतिबंधित करून यशोधन नगरच्या दिशेने उजवे वळण घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर वाहनांना पुढील प्रवास करता येईल.
दरम्यान, या वाहतूक निर्बंधातून अत्यावश्यक आणि आपत्कालीन सेवांच्या वाहनांना सूट देण्यात आली आहे.
पोलिस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉरची वाहने, ऑक्सिजन पुरवठा करणारे ट्रक तसेच इतर अत्यावश्यक सेवांची वाहने या मार्गावरून निर्बंधांशिवाय जाऊ शकतील.
30 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून 31 ऑगस्टच्या पहाटेपर्यंत वागळे परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर 31 ऑगस्ट रोजी पहाटे 5 नंतर वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे. मात्र, कामाच्या स्थितीनुसार वाहतूक व्यवस्थेत बदल होऊ शकतो.
हेही वाचा
