कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका जोखमीची कामे करणाऱ्या 1 हजार कर्मचाऱ्यांची खासगी प्रयोगशाळांमार्फत अॅण्टिबॉडी चाचणी करणार आहे. कोणत्याही विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर शरीरातील प्रतिकारशक्ती अधिक कार्यरत होते. या विषाणूंचा सामना करण्यासाठी शरीरात अॅण्टिबॉडीज तयार झालेल्या असतात. त्यामुळे ज्या रुग्णांची अॅण्टिबॉडी चाचणी सकारात्मक असेल त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं स्पष्ट होते. यावरून त्या व्यक्तींना विलगीकरणात ठेवून कोरोनाचा संसर्ग प्रसार रोखणं शक्य आहे.
कोरोनाची चाचणी खर्चीक आणि वेळखाऊ आहे. तसंच या चाचण्या करण्याची क्षमताही मर्यादित आहे. . अॅण्टिबॉडी चाचणी करण्यासाठी वेळ कमी लागतो. तसंच खर्चही कमी येतो. त्यामुळे मुंबई पालिकेने ही चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार असे कोरोनाबाधितांच्या संपर्कात येणाऱ्या १ हजार व्यक्तींची चाचणी केली जाणार आहे. चाचणी ऐच्छिक असून कोणालाही बंधनकारक नसेल. यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री मागविणे किंवा बाहेरील प्रयोगशाळामार्फत करवून घेण्याचे दोन पर्याय सध्या पालिकेसमोर आहेत.
यंत्रसामुग्री, आवश्यक किट खरेदी करून चाचण्या करण्यास वेळ लागू शकतो. यामुळे सुरुवातीला दोन ते तीन खासगी प्रयोगशाळांचा विचार केला जात आहे. यासाठी सर्वसाधारणपणे ३५० रुपये शुल्क आकारले जाईल, अशी मर्यादा ठेवली आहे. लवकरच या चाचण्या सुरू होऊन त्यांच्या अहवालांचे निष्कर्ष विचारात घेऊन पुढे या चाचण्या कराव्यात का, याचा निर्णय पालिका घेणार आहे.
हेही वाचा -