झाडे कापण्यास तसंच पुनर्रोपित करण्यास वृक्ष प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असली तरी २५ पेक्षा कमी असलेल्या सर्व झाडांच्या कापणीस परवानगी देण्याचे अधिकार महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे केवळ ५० हून अधिक झाडे कापायची असल्यास वृक्षप्राधिकरणाच्या २ सदस्यांसह पाहणी केली जाते. त्याऐवजी १० झाडे कापायची असली, तरी त्याची वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्यांनी पाहणी करावी, अशी मागणी सभागृहनेते यशवंत जाधव यांनी केली होती. या मागणीला आयुक्तांनी मूक संमती दिली आहे.
पूर्वी मुंबईतील कोणत्याही विकासकामांमध्ये १० पेक्षा अधिक झाडे कापायची अथवा पुनर्रोपित करायची असल्यास वृक्ष प्राधिकरणाच्या २ सदस्यांसह स्थळाची पाहणी केली जायची. परंतु २५ हून कमी झाडे कापण्यास परवानगी देण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यात आल्यामुळे ही प्रथा बंद झाली. सद्यस्थितीत ५० पेक्षा अधिक झाडे कापायची असल्यासच प्राधिकरणाच्या २ सदस्यांसह झाडांची पाहणी केली जाते. परिणामी झाडे कापण्यावर प्राधिकरणाचा कोणताही अंकुश नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे जुनी पद्धत पुन्हा सुरु करण्याची मागणी जाधव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती.
सध्याच्या पद्धतीला प्राधिकरणाच्या समितीनेच परवानगी दिली होती. २५ हून कमी झाडे कापण्याचे प्रस्ताव अजूनही समितीसमोर येतात. त्यामुळे पूर्वीची पद्धत पुन्हा सुरु करायची असल्यास गटनेत्यांच्या सभेत निर्णय घेण्यात यावा, असं आयुक्तांनी आपल्या अभिप्रायात स्पष्ट केलं अाहे.
कायद्यानुसार कापण्यात येणाऱ्या झाडांची प्राधिकरण समितीच्या सदस्यांनी तपासणी करावी अशी कुठलीही तरतूद नाही. त्यामुळे तशी परवानगी देता येत नाही. तसेच याबाबत न्यायालयात याचिका असल्यामुळे याबाबत आपण स्वत: काही निर्णय जाहीर करणार नाही. यावर सभागृहनेते यशवंत जाधव यांनी प्रथा आणि परंपरेनुसार जी पाहणी केली जात होती, ती पुन्हा सुरु करावीत हीच मागणी असल्याचं सांगितलं.
त्यावर आयुक्तांनी, आपण काहीही यावर बोलू शकत नाही. जर प्रथा व परंपरा असेल तर विचार केला जाईल. परंतु एकाच ठिकाणाची दोनदा पाहणी करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असंही त्यांनी सांगितल्याचं समजतं.