कर्करोग संदर्भातील उपचारांसाठी वैद्यकीय संशोधक आणि व्यावसायिकांनी चौकटी बाहेर जाऊन संशोधन करावे, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी केलं. टाटा मेमोरिअल केंद्रात पदवीदान समारंभादरम्यान ते बोलत होते.
पर्यायी उपाय म्हणून संशोधकांनी आयुर्वेदासारख्या प्राचीन भारतीय वैद्यकीय प्रणालीचा शोध घ्यावा, असंही नायडू यांनी सांगितलं. कर्करोगावरील उपचार किफायतशीर दरात उपलब्ध व्हावे, यासाठी स्वदेशी उपचार शोधण्याचे आवाहन त्यांनी केलं.
लोकांना कर्करोगावरील विविध उपचारांच्या पर्यायांची माहिती व्हावी, यासाठी कर्करोगाबाबत जागरुकता निर्माण करावी, असं आवाहन त्यांनी केलं. भारतात कर्करोग ही प्रमुख आरोग्य समस्या असून, मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या दहा आजारांपैकी एक आहे आणि याचे उपचारही खूप महाग आहेत, असे ते म्हणाले.
लोकांची लवकर चाचणी केली तर या रोगाचे लवकर निदान होईल, असं मत नायडू यांनी व्यक्त केलं. आपण कसे जगतो आणि कसा विचार करतो, याच्या मुळाशी लोकांनी जायला हवं, असंही ते म्हणाले.
तरुणांमध्ये निरोगी जीवनशैलीसाठी जंकफुडचा वापर टाळण्याबाबत जनजागृती निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. देशभरात वेदनाशामक आरोग्य केंद्र वाढवण्याच्या गरजेवर उपराष्ट्रपतींनी भर दिला.
डॉक्टर आणि वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छता राखण्याबाबत जनजागृती करावी, असं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं. वैयक्तिक स्वच्छतेच्या अभावामुळे एचपीव्हीसारखा संसर्ग होतो, ज्यामध्ये कर्करोग होण्याची शक्यता असते.