महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा (coronavirus) संसर्ग इतक्या झपाट्याने वाढतोय की राज्य सरकारला नाईलाजाने राज्यभरात रात्रीची संचारबंदी लावण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. परिस्थिती नियंत्रणात न आल्यास पुन्हा एकदा पूर्ण लाॅकडाऊन लावण्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र पुन्हा एकदा लाॅकडाऊन लावणं महाराष्ट्राला परवडणारं नसल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्य मंत्रिमंडळातच लाॅकडाऊनबाबत मतभेद असल्याचं उघड होत आहे.
लाॅकडाऊन लावण्याबाबत वृत्तसंस्थेने नवाब मलिक (nawab malik) यांना प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने तसंच कोरोनाबाबच्या नियमांचं काटेकोरपणे पालन होत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला लाॅकडाऊनची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. याचा अर्थ लगेल लाॅकडाऊन केला जाईल, असं नाही. नागरिकांनी नियमांची पालन केल्यास लाॅकडाऊन नक्कीच टाळता येऊ शकतो. पुन्हा लाॅकडाऊन सहन करण्याची क्षमता आता कुणातच राहिलेली नाही. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना इतर पर्यायांवर विचार करण्याची विनंती केली आहे.
हेही वाचा- मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख पार
तर लाॅकडाऊन
एकीकडे आपण कोविड परिस्थितीतही अर्थव्यवस्था सुरु राहील याचा आटोकाट प्रयत्न करतोय. मात्र अनेक घटक अजूनही ही गोष्ट गांभीर्याने घेत नाहीत. अजूनही खासगी कार्यालयातून उपस्थिती नियमांचं पालन होत नाही. विवाह समारंभ नियम तोडून सुरु आहेत. बाजारपेठांमध्ये देखील सुरक्षित अंतर, मास्क याचं पालन होताना दिसत नाही.
शेवटी लोकांच्या आरोग्याचं संरक्षण करणं याला आमचं प्राधान्य आहे. त्यामुळे अतिशय कठोरपणे नियमांचं पालन करावं अन्यथा लॉकडाऊन करावं लागेल असं समजून धान्य पुरवठा, औषधी, अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सुविधा यांचे नियोजन करण्याचे निर्देश उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.
थोडीफार घट
महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात कमी नोंदवण्यात आली. एक दिवस आधीच ४० हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्यावर सोमवार ३१,६४३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर मागील २४ तासांत १०२ जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या वाढून २७,४५,५१८ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत २३,५३,३०७ जण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत ३,३६,५८४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
‘या’ शहरांत पूर्ण लाॅकडाऊन
मुंबई, पुणे, नागपूर सोबत इतर अनेक शहरांत कोरोना चांगलाच फैलावत चालला आहे. त्यामुळे या शहरांत पुन्हा निर्बंध घालण्यात आले आहेत. औरंगाबाद आणि नागपूरमध्ये पूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. नागपूरमध्ये ३१ मार्च पर्यंत लॉकडाऊन असेल, तर औरंगाबादमध्ये ३० मार्चपासून ८ एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन चालेल. लॉकडाऊन दरम्यान केवळ अत्यावश्यक सेवांनाच मुभा असेल. त्याशिवाय राज्यभरात रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे.