कॉफी विथ करण या शोमध्ये भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांनी महिलांबद्दल केलेलं वक्तव्य त्यांना चांगलंच भोवलं आहे. यापूर्वी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. परंतु काही दिवसांनी त्यांना क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली. त्यानंतर आता लोकपालांनी त्यांना २० लाखांचा दंड ठोठावला आहे.
कॉफी विथ करण या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकपालांनी पंड्या आणि राहुलला नोटीस बजावली होती. तसंच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश लोकपाल डी.के.जैन यांनी दिले होते. राहुल आणि पंड्या यांच्यावरील तात्पुरतं निलंबनही मागे घेण्यात आलं होतं. त्यानंतर आता लोकेश राहुल आणि हार्दिक पंड्या यांची बाजू ऐकून घेण्यात आली. चौकशीनंतर लोकपलांनी त्यांना २० लाखांचा दंड ठोठावला आहे.
ठोठावण्यात आलेल्या दंडापैकी १० लाख हे पॅरा मिलिटरी फोर्सेसच्या १० शहीद जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाख या प्रमाणे देण्यात यावे, तसंच १० लाख रूपये अंध क्रिकेटच्या निधीसाठी आणि प्रसिद्धीसाठी देण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. तसंच ४ आठवड्यांमध्ये त्यांना ही रक्कम भरावी लागणार आहे.
हेही वाचा -
विजय शंकर, कार्तिकला संधी, वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर