जगभरात कोरोना व्हायरसमुळं भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणं देशांतर्गत स्पर्धा देखील रद्द करण्यात आल्या असून, आयपीएल स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं अनेक क्रिकेटप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. मात्र आता आयपीएल रद्द होण्याच्या मार्गावर आसल्याची स्थिती आहे. देशभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, बीसीसीआयने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा काही काळासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
२९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धा बीसीसीआयनं १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली. सर्व भारतीय खेळाडूंनीही या काळात स्वतःला घरामध्ये बंदिस्त करत आपल्या चाहत्यांना प्रशासकीय यंत्रणांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिस्थिती नियंत्रणात न आल्यास बीसीसीआय वर्षाच्या अखेरीस छोटेखानी स्पर्धा खेळवू शकते. तसंच, मार्च महिन्याच्या अखेरीस यावर निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात न आल्यास बीसीसीआय यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द करण्याची शक्यता आहे.
मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरु यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये करोनाचे रुग्ण आढळत आहे. परदेशातून आलेल्या रुग्णांना सरकार क्वारंटाईन करत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बहुतांश राज्यांनी ३१ मार्चपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचा अपवाद वगळता सर्व सेवा बंद ठेवल्या आहेत. रेल्वे, मेट्रो, आंतरराज्य बससेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला मोठं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयचे उच्च अधिकारी दर आठवड्याला परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मंगळवारी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अधिकारी आणि सर्व संघमालक यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा होणार आहे.
या बैठकीत आयपीएलच्या भवितव्याबद्दल निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेही १५ एप्रिलनंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन आयपीएलला परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे.