आयसीसी टी-२० विश्वचषकानंतर युएईतून भारतात परतणाऱ्या क्रिकेटपटू हार्दिक पंड्याला सीमा शुल्क विभागाचा (कस्टम) दणका बसला आहे. सीमा शुल्क विभागानं हार्दिक पंड्याकडून २ महागडी घड्याळं जप्त केली. या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंड्याला घड्याळांबाबत विचारणा केली असता, तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. तसंच हार्दिक पंड्या घड्याळांचे बिलही दाखवू शकला नाही, त्यानंतर विभागानं दोन्ही घड्याळे जप्त केल्याची माहिती वृत्त समोर आलं. शिवाय ही दोन्ही घड्याळ्यांची किंमत तब्बल ५ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, सर्व प्रकाराबाबत हार्दिक पंड्यानं खुलासा केला आहे.
हार्दिक पंड्यानं केलेल्या खुलासामध्ये त्यानं घड्याळाची किंमत पाच कोटी नाही तर १.५ कोटी रुपये आहे, असं म्हटलं. हार्दिक पंड्यानं ट्विटरवर यांदर्भात एक पोस्ट टाकली आहे. '१५ नोव्हेंबरला माझे सामान घेऊन सोमवारी सकाळी दुबईहून आल्यावर, मी स्वेच्छेनं मुंबई विमानतळाच्या कस्टम काउंटरवर मी आणलेले सामान घोषित करण्यासाठी आणि आवश्यक कस्टम ड्युटी भरण्यासाठी गेलो होतो. मुंबई विमानतळावरील कस्टम्सबद्दल माझ्याबाबत सोशल मीडियावर गैरसमज आहेत आणि काय झाले ते मी स्पष्ट करू इच्छितो', असं हार्दिक पंड्यानं म्हटलं.
— hardik pandya (@hardikpandya7) November 16, 2021
'मी दुबईमधून कायदेशीररीत्या खरेदी केलेल्या सर्व वस्तू मी स्वेच्छेनं घोषित केल्या होत्या आणि जे काही शुल्क भरावं लागेल ते भरण्यास तयार होतो. खरं तर, सीमाशुल्क विभागानं शुल्काचं योग्य मूल्यांकन केलं आहे, जे मी भरण्याचे आधीच निश्चित केलं आहे. सोशल मीडियावर फिरत असलेल्या अफवांनुसार, घड्याळाची किंमत ५ कोटी नाही तर १.५ कोटी रुपये आहे,” असंही पंड्यानं म्हटलं.
'मी देशाचा कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे आणि मी सर्व सरकारी संस्थांचा आदर करतो. मला मुंबईच्या सीमाशुल्क विभागाकडून पूर्ण सहकार्य मिळालं आहे आणि मी त्यांना माझ्या पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली आहे, आणि त्यांना हे प्रकरण मिटवण्यासाठी जे काही वैध कागदपत्रे लागतील ते पुरवीन. कोणतीही कायदेशीर मर्यादा ओलांडण्याचे माझ्यावरील सर्व आरोप पूर्णपणे निराधार आहेत', असंही हार्दिक पंड्यानं म्हटले आहे.