जीवघेण्या कोरोनाचा क्रिकेट विश्वाला चांगलाच फटका बसला आहे. कोरोनामुळं भारताच्या दौऱ्यांपासून अनेक क्रिकेट सामने रद्द करण्यात आले असून, आता ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसमुळं निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं आयसीसीनं हा निर्णय घेतला आहे.
आयसीसीनं यासंदर्भात मंगळवारी अधिकृत घोषणा केली आहे. मागील २ महिन्यांपासून या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयसीसी विचार करत होतं, परंतू यजमान क्रिकेट ऑस्ट्रेलियानं आयोजन करण्याबद्दल असमर्थता दर्शवल्यानंतर अखेरीस आयसीसीनं हा निर्णय घेतला आहे. १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतू करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता ऑस्ट्रेलियन सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत संपूर्ण देश लॉकडाउन केला.
ऑस्ट्रेलियन सरकारनं काही महिन्यांपूर्वी नियमांमध्ये शिथीलता आणली होती. परंतू, रुग्णांची संख्या वाढताच सरकारनं परत लॉकडाउन घोषित केलं आहे. परंतू देशातली एकंदर परिस्थिती आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियावरचं आर्थिक संकट लक्षात घेता, विश्वचषकाचं आयोजन करणं अशक्य असल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याआधीच जाहीर केलं होतं. त्यानंतर स्पर्धेचं आयोजन पुढे ढकलणं जाणं ही फक्त एक औपचारिकता मानली जात होती.
ICC Men's T20 World Cup 2020 postponed, due to COVID19 pandemic. pic.twitter.com/mFSe1vvZ4t
— ANI (@ANI) July 20, 2020
२०२१ साली होणारा टी-२० विश्वचषक हा ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात खेळवला जाणार असल्याची माहिती आयसीसीनं जाहीर केली. तसंच, टी-२० विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता बीसीसीआयसमोर आयपीएलच्या १३व्या हंगामाचं आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १३व्या हंगामाच्या आयोजनासाठी बीसीसीआयने तयारी सुरु केली होती, फक्त आयसीसीने टी-२० विश्वचषकाबद्दल अधिकृत घोषणा जाहीर करण्याची वाट बीसीसीआयला पहायची होती.
मुंबईत कोव्हिड योद्ध्यांची हंगामी भरती
महापालिकेच्या 'या' विभागात मोफत कोरोना चाचणी