गेल्या तीन आठवड्यांपासून न्यूझीलंडमध्ये विश्वविजेतेपदासाठी सुरु असलेला संग्राम अखेर संपला आहे. आणि तमाम भारतीयांसाठी या संग्रामाचा शेवट आतिषबाजीने झाला आहे. भारताच्या U-19 क्रिकेट टीमने वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारल वर्ल्डकपवर भारताचं नाव कोरलं. चौथ्यांदा!
मुंबईकर पृथ्वी शॉनं U-19 टीमच्या कर्णधारपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळून भारताच विश्वविजेतेपदापर्यंतचा प्रवास संस्मरणीय बनवला. त्याच्या स्वत:साठी, त्याच्या टीममेट्ससाठी आणि तमाम भारतीयांसाठी. या टीमसोबतच भारतीयांच्या कौतुकाची थाप पडली ती त्याच्या कारकिर्दीत 'द वॉल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि या U-19 वर्ल्डकप विजेत्या टीमचा कोच असलेल्या राहुल द्रविडच्या पाठीवर!
अंतिम सामन्यामध्ये टॉस कोण जिंकणार याची सर्वांना उत्सुकता होती. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि तमाम भारतीयांच्या पोटात भितीचा गोळा उठला. ४७.२ ओव्हर्समध्ये ऑस्ट्रेलियाने २१६ रन्स बनवून भारतासमोर २१७ रन्सचं आव्हान ठेवलं. यामध्ये मधल्या फळीतील जोनाथन मार्लोने तडकावलेल्या ७६ रन्सची खेळी महत्त्वाची ठरली. मात्र, अनुकुल रॉय, इशान पोरेल, शिवा सिंग आणि कमलेश नागरकोटी या भरतीय बॉलर्सच्या फळीने प्रत्येकी २ विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला चांगलाच आवर घातला.
२१७ रन्सचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय टीमची सुरुवात धमाकेदार झाली. सलामीवीर मनजोत कालराने तडाखेबाज शतक ठोकून भारतीय विजय सोपा केला. मुंबईकर कॅप्टन पृथ्वी शॉ २७ धावांमध्ये परतल्यानंतर शुभम गिल मैदानात उतरला. संपूर्ण सीरीजमध्ये प्रत्येक मॅचमध्ये अर्धशतक झळकावणारा आणि मॅन ऑफ द सिरीज ठरलेल्या शुभम गिलने मनजोतला उत्तम साथ दिली.
शुभम बाद झाल्यानंतर भारतीय विकेट किपर हार्विक देसाई मैदानात उतरला. आणि त्याने मनजोतच्या साथीने U-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यामध्ये भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. १०२ बॉलमध्ये १०१ रन्सची खेळी करणारा मनजोत कालरा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. ८ चौकार आणि ३ षटकारांनी त्याने त्याची खेळी सजवली.
या विजयानंतर भारताने आणखीन एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. चार वेळा U-19 वर्ल्डकप जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे. याआधी २०००, २००८, २०१२ आणि आता २०१८ अशा चार वेळा भारताने विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आहे.