मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात मुंबईतील वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात बंगळुरुला पुन्हा एकदा मुंबईकडून पराभव पत्करावा लागला आहे. मुंबईनं ५ विकेट राखून बंगळुरुचा पराभव केला आहे. हार्दिक पंड्यानं १६ चेंडूंत नाबाद ३७ धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह मुंबईनं गुणतालिकेत तिसरं स्थान पटकावलं आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या १७२ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सच्या सलामीवीर फलंदाजांनी धमाकेदार सुरुवात केली. मुंबईन पहिल्या ६ षटकांमध्ये १० च्या सरासरीनं धावा केल्या. रोहितनं २८ धावा केल्या, तर डिकॉक यानं ४० धावा केल्या. परंतु, त्यानंतर रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक बाद झाले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या इशान किशन, कृणाल पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी संघाचा डाव सावरला. मात्र, मोठा फटका मारण्याच्या नादात सूर्यकुमार २९ धावांवरच बाद झाला.
कर्णधार रोहित शर्मानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरुला प्रथम फलंदाजी करताना कर्णधार विराटकोहलीच्या रुपात पहिला धक्का बसला. कोहलीला ८ धावा करता आल्या. तसंच, पार्थिव पटेल यालाही मोठी खेळी करता आली नाही. पार्थिवने २० चेंडूंत २८ धावा केल्या. मात्र, पार्थिव पटेल बाद झाल्यावर एबी डी व्हिलियर्सनं संघाचा डाव सावरला. तसंच, मोईन अलीनं देखील त्याला चांगली साथ दिली. अलीनं ३२ चेंडूंत ५० धावा केल्या, तर डी व्हिलियर्सनं ५१ चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मारत ७५ धावा केल्या.
मागील सामन्यात मुंबईचा जलद गोलंदाज जोसेफ अल्झारी याला दुखापत झाल्यामुळं या सामन्यात लसिथ मलिंगाला संधी देण्यात आली होती. मलिंगानं ४ षटकात ४ गडी बाद करत ३१ धावा दिल्या. तसंच, जेसन बेहरनडॉर्फ आणि बुमराह यांनी प्रत्येकी १ विकेट घेतल्या.