Advertisement

IPL 2021 - प्रेक्षकांना आयपीएलचा सामना मैदानात बसून पाहायला मिळणार

तिकीट बुकिंगसंदर्भातील सर्व माहिती जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर...

IPL 2021 - प्रेक्षकांना आयपीएलचा सामना मैदानात बसून पाहायला मिळणार
SHARES

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर भारतात होणार इंडियन प्रीमियर लीग आयपीएलचा थरार मध्येच थांबवण्यात आला. खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा आयपीएलच्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचं दुसरं पर्व येत्या १९ सप्टेंबरपासून पुन्हा एका नव्या जोमाने सुरु होत आहे. दुबई, शारजा आणि आबु धाबीमधील मैदानांवर आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जाणार आहेत. 

कोरोना नियमांचे पालन करुन आणि युएई सरकारने आखून दिलेल्या नियमांनुसार या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात पहिला सामना ५ वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि ३ वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. 

हा सामना क्रिकेटी चाहत्यांसाठी खास असणार आहे, कारण इंडियन प्रीमियर लीगच्या १४ व्या हंगामाच्या दुसऱ्या टप्प्यात प्रेक्षकांना मैदानात प्रवेश मिळणार आहे. बीसीसीआयनं यासाठी परवानगी दिली आहे. तिकीट बुकिंगसंदर्भातील सर्व माहिती आयपीएल साइटवर शेअर करण्यात आली आहे. चाहते १६ सप्टेंबरपासून तिकीट बुक करू शकतात. अधिकृत वेबसाईट www.iplt20.com व्यतिरिक्त, PlatinumList.net साईटवरूनही तिकीट बुकिंग करता येणार आहे. 

लीगच्या आयोजकांनी स्टेडियममध्ये किती प्रेक्षक उपस्थित असतील हे सांगितलं नसलं तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्टेडियमच्या क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश दिला जाईल.

तब्बल २८ महिन्यांनंतर प्रेक्षक स्टेडियममध्ये परतत आहेत. मे २०१९ मध्ये भारतात झालेल्या आयपीएलच्या 12 व्या हंगामाच्या शेवटच्या वेळी प्रेक्षक मैदानावर उपस्थित होते. यानंतर, २०२० मध्ये यूएई आणि २०२१ मध्ये भारतात आयोजित पहिल्या टप्प्यात, प्रेक्षकांना मैदानात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयामुळे बीसीसीआयला पहिल्या टप्प्यातील नुकसानीची भरपाई करता येणार आहे.

आयपीएलचे उर्वरित ३१ सामने दुबई, शारजाह आणि आबू धाबी येथे २७ दिवसात खेळले जातील. आयपीएल २०२१ पहिला टप्पा कोरोना प्रादुर्भावामुळे ४ मे रोजी पुढे ढकलण्यात आला. २ मे पर्यंत एकूण २९ सामने खेळले गेले होते.

पहिल्या टप्प्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्स ८ सामन्यांत ६ विजयांसह पहिल्या स्थानावर आहे तर चेन्नई सुपर किंग्स ५ विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आरसीबी संघ पाच विजयांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा