९० च्या दशकात बहुचर्चित शेअर बाजारात घोटाळ्यातील १० आरोपींची न्यायालयाने २६ वर्षानंतर निर्दोष मुक्तता केली आहे. या आरोपींमध्ये बँक आॅफ इंडियाच्या सात तर स्टेट बँक आॅफ इंडिया (कॅपिटल मार्केट लिमिटेड)च्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय तपास यंत्रणा (सीबीआय), सिक्युरिटी अँड फ्राॅड विभाग (एसबी)चे अधिकारी या आरोपींवर गुन्हा सिद्ध करण्यास सपशेल अपयशी ठरल्यानं न्यायालयाने या आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.
१९९२ मध्ये हर्षद मेहता याने बँकांच्या पदाधिकाऱ्यांशी संगनमत करून आणि भांडवल बाजारातील दलालांना हाताशी धरून देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरवून टाकणारा ७०० कोटी रुपयांचा भांडवल बाजार घोटाळा केला होता. या घोटाळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसल्यानं ती डळमळली. या घोटाळ्यानंतर शेअर बाजारात ही मोठी उलथापालथ झाली.
याप्रकरणी न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर- जोशी यांनी सुधीर मेहता याच्यासह हर्षदचा चुलतभाऊ दीपक, एनएचबी अधिकारी सी. रविकुमार आणि सुरेश बाबू, माजी स्टेट बँक अधिकारी आर. सीताराम आणि दलाल अतुल पारेख यांना या घोटाळ्याप्रकरणी दोषी ठरवलं. परंतु, या घोटाळ्याचा कर्ताकरविता हर्षद मेहता याचा २३ एप्रिल २००२ मध्ये मृत्यू झाला.
पुढे या घोटाळ्यात संगनमत केल्याच्या आरोपावरून बँक आॅफ इंडियाच्या सात तर स्टेट बँक आॅफ इंडिया (कॅपिटल मार्केट लिमिटेड)च्या तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. मात्र या गुन्ह्यातील त्याचा सहभाग सीबीआय आणि एसबीच्या अधिकाऱ्यांना न्यायालयात सिद्ध करता न आल्यामुळे तब्बल २६ वर्षानंतरच्या प्रदिर्घ कालानंतर न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर- जोशी यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.