कोरेगाव-भीमा हिंसा प्रकरणात नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याच्या आरोप असलेले ज्येष्ठ विचारवंत प्रा. आनंद तेलतुंबडे यांना मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी जोरदार धक्का दिला. तेलतुंबडे यांनी कोरेगाव-भीमा हिंसेप्रकरणी पुणे पोलिसांनी नोंदवलेला एफआयआर रद्द करण्यासाठी फौजदारी रिट याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. मात्र असं करत असताना न्यायालयाने त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी ३ आठवड्याची मुदत देखील दिली आहे.
कोरेगाव-भीमा हिंसाचाराशी आपला कुठलाही संबंध नसून याप्रकरणात आपल्याला विनाकारण गोवल्याचा दावा करत तेलतुंबडे यांनी ही एफआयआर रद्द करण्याची मागणी केली असली, तरी तेलतुंबडे यांच्याविरोधात अनेक पुरावे असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. त्यामुळे न्यायालयाने तेलतुंबडे यांची याचिका फेटाळून लावली. मात्र त्यांना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी ३ आठवड्यांची मुदत दिली आहे.
पुण्यात ३१ डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या एल्गार परिषद तसंच १ जानेवारीला कोरेगाव-भीमा इथं घडलेल्या हिंसाचारामागे नक्षलवाद्यांचा हात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. एवढंच नाही, तर मानवाधिकार व सामाजिक कार्यकर्त्यांचा या नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचं म्हणत पुणे पोलिसांनी याप्रकरणी तेलतुंबडे यांच्यासहित अनेकांवर गुन्हे नोंदवले आहेत.
हेही वाचा-
तेलतुंबडे, नवलखा यांना अटकेपासून दिलासा
नक्षलवादी कनेक्शन: फरेरा, गोन्साल्वीस यांना पोलिस कोठडी