नववर्षाच्या पहिल्या दिवशीच स्पेशल कोर्ट पीएमएलएनं मद्यसम्राट विजय माल्ल्या याला मोठा झटका दिला आहे. भारतीय स्टेट बँकेसह देशातील बँकांना विजय माल्ल्याचा जप्त केलेल्या मालमत्तेची विक्री करून कर्जाची थकीत रक्कम वसूल करण्याची परवानगी न्यायालयानं दिली आहे.
माल्ल्याच्या वकिलांनी यावर आक्षेप घेतला होता. याबाबतचा निर्णय डेट रिकव्हरी ट्रिब्यूनलच घेऊ शकतो, असं माल्ल्याच्या वकिलांचं म्हणणं होतं. मुंबई उच्च न्यायालयात माल्ल्यानं अपील करावं म्हणून विशेष न्यायालयानं त्यावर १८ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली होती. त्यावर विशेष न्यायालयानं आता हा निर्णय दिला असून माल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव होणार आहे.
वसुलीवर काहीच आक्षेप नसल्याचं ईडीनंही सांगितल्यामुळे न्यायालयानं माल्ल्याच्या संपत्तीचा लिलाव करण्याची बँकांना परवानगी दिली आहे. माल्या कोर्टाच्या या आदेशाविरूद्ध मुंबई हायकोर्टात अपील दाखल करू शकतो.
देशातील विविध बॅंकांना चूना लावून विजय माल्ल्याने मार्च 2016 मध्ये लंडन येथे पलायन केले होते. विजय माल्ल्या याला परत देशात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि भारतीय तपास संस्था प्रयत्न करत आहे. मात्र, अद्याप त्यांना यश आलेले नाही. गेल्या महिन्यात स्टेट बँकेच्या नेतृत्वाखाली भारतीय बँकांनी लंडनमधील एका न्यायालयत विजय मल्ल्या याच्या मालमत्ता जप्त करणे आणि दिवाळखोर घोषित करण्याची मागणी केली होती.