भांडुपमध्ये दोन दिवसात चार हत्या


भांडुपमध्ये दोन दिवसात चार हत्या
SHARES

भांडुपमध्ये फेरीवाल्यासह त्याच्या दोन मुलांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच आता आणखी एका तरुणाच्या हत्येची बाब उघडकीस आली आहे. नरेश शेट्टी असं या मृत व्यक्तीने नाव असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी भांडुप पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.


स्थानिकांनी दिली पोलिसांना माहिती

भांडुपच्या गावदेवी येथील नरदासनगर परिसरात रविवारी सकाळी एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. चौकशीत या तरुणाचं नाव नरेश शेट्टी असल्याचं समजते. अज्ञात मारेकऱ्यांनी नरेशची हत्या करून त्याचा मृतदेह एका निर्जनस्थळी उभी असलेल्या रिक्षात ठेवून पसार झाले. रिक्षातून मोठ्या प्रमाणात रक्त रस्त्यावर पडल्याचे पाहून अनेकांनी रिक्षाच्या दिशेने धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात नरेशला पाहून स्थानिकांनी भांडुप पोलिसांना पाचरण केल्यानंतर पोलिसांनी नरेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळील शासकीय रुग्णालयात पाठवला. याचसोबत हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

प्राथमिक माहितीनुसार प्रेमप्रकरणातून नरेशची हत्या करण्यात आल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती भांडुप पोलिस ठाण्यातले वरिष्ठ पोलिस निरिक्षक श्रीनिवास पन्हाळे यांनी दिली.

हत्येमागे टोळीवाद?

दोन दिवसांपूर्वीच भांडुपच्या झकेरिया कंपाऊड येथे फेरीचा व्यवसाय लावण्यावरून तिघांनी फेरीवाल्यासह त्याच्या दोन मुलांची हत्या केली होती. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह दोघांना अटक केली होती. या हत्येमागे टोळीवाद असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. पण नरेशच्या हत्येनंतर मात्र या परिसरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचं म्हणावं लागेलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा