पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केमिकल हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या एका तरूणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. काशीनाथ मंडल (२२) असं त्याचं नाव असून ते मुंबईत सुरक्षा रक्षकाचं काम करतो.
काशीनाथ मंडल हा मुळचा झारखंड येथील रहिवासी असून गेल्या काही वर्षापासून तो मुंबईतील वाळकेश्वर येथील एका झोपडपट्टीत राहत होता. त्याने दिल्ली येथील एनएसजी नियंत्रण कक्षाचा नंबर मिळवून शुक्रवारी २७ जुलैला त्या नंबरवर फोन करुन नरेंद्र मोदी यांच्यावर केमिकल हल्ला करण्याची धमकी दिली. एनएसजीने त्वरीत ज्या नंबरनरुन हा फोन आला होता त्या नंबरला ट्रेस केले. त्यात हा नंबर मुंबईतील असल्याचं आढळलं. एनएसजीने मुंबई पोलिसांशी संपर्क करुन याची माहिती दिली. मुंबई पोलीसांनी तात्काळ कार्यवाही करत काशीनाथ याला मुंबई सेंट्रल स्थानकातून ताब्यात घेतले. त्यावेळी तो रेल्वेने सुरतला पळून जाण्याच्या तयारीत होता.
झारखंडमध्ये एका नक्षली हल्ल्यात काशीनाथचा मित्र मारला गेला होता. त्यासंदर्भात त्याला मोदींची भेट घ्यायची होती. म्हणूनच त्याने हा सर्व प्रकार केला असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्याच्यावर आईपीसीच्या कलम ५०५ (१) आणि (२) तसेच कलम १८२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा -
११ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मेट्रोमोनियल साईटवर जोडीदार शोधताय, सावधान !