'हे' आहेत मुंबईतले टाॅप एन्काऊंटर स्पेशलिस्ट

पोलिस दलातील काही धडाकेबाज अधिकाऱ्यांनी या गुंडांचा एन्काऊंटर करत गुन्हेगारी टोळ्याचं वर्चस्व मोडून काढलं. गुुंडांचा कर्दनकाळ म्हणून या अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती.

'हे' आहेत मुंबईतले टाॅप एन्काऊंटर स्पेशलिस्ट
SHARES

मुंबईत एकेकाळी गुन्हेगारी टोळींच्या कारवाईनी मुंबईकर त्रस्त झाले होते. पोलिसांसाठीही या टोळ्या मोठ्या डोकेदुखी ठरल्या आहेत. मात्र, पोलिस दलातील काही धडाकेबाज अधिकाऱ्यांनी या गुंडांचा एन्काऊंटर करत गुन्हेगारी टोळ्याचं वर्चस्व मोडून काढलं. गुुंडांचा कर्दनकाळ म्हणून या अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. ९० च्या दशकातील अनेक नामचीन गुंडाचा या पोलिस अधिकाऱ्यांनी खात्मा करत मुंबईत कायदा व सुव्यवस्था बिघडू दिली नाही. 


रविंद्र आंग्रे

पोलिस सेवेत असताना रविंद्र आंग्रे हे सतत चर्चेत राहिले. ठाण्यासह मुंबईत ते गुन्हेगारांनासाठी कर्दनकाळ म्हणूनच ओळखले जातात. मुंबईसह ठाण्यातील गुंडांच्या मुसक्या आवळत आंग्रे यांनी आतापर्यंत ५३ गुंडांचे एन्काऊंटर केले आहे. त्यापैकी मुंबईत ३३ तर ठाण्यात २१ गुंडांचा त्यांनी खात्मा केला. नवी मुंबई, डोंबिवली आणि अंबरनाथ परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात गुंड सुरेश मंचेकर टोळीला सुरूंग लावण्याचं काम आंग्रे यांनी केलं. तर ठाणे-भिवंडी परिसरात असताना, त्या भागातील नामचीन गुन्हेगारांचे आंग्रे यांनी कंबरडे मोडले. मात्र, कालांतराने आंग्रे यांना त्यांची एन्काऊन्टर स्पेशलिस्ट ही इमेज बाधली. फेब्रुवारी २००८ मध्ये ठाण्यातील एका विकासकाला खंडणीसाठी धमकवल्याप्रकरणी तर २०१० मध्ये एका व्यक्तीवर गोळीबार प्रकरणात आंग्रे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला. या गुन्ह्यात आंग्रे यांना १४ महिने जेलमध्ये रहावे लागले. मात्र आंग्रे यांची सबळ पुराव्यांअभावी सर्व आरोपातून सुटका करत त्यांचे निलंबन रद्द केले. कालांतराने आंग्रे यांनी पोलिस सेवेतून निवृत्ती घेत भाजपा मध्ये प्रवेश केला.   


प्रदीप शर्मा

मूळचे उत्तरप्रदेशच्या आग्राचे असलेले प्रदीप शर्मा १९८३ च्या बॅचचे अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिस दलात शर्मा यांनी पोलिस उपनिरीक्षक म्हणून प्रवेश केला. शर्मा यांच्या कारकिर्दीला खरी धार चढली ती युतीच्या काळात. ९० च्या दशकात डी कंपनी आणि इतर टोळ्यांमधील चकमकी  दिवसाढवळ्या घडत होत्या. या गुंडांना आवर घालणं कठिण होऊन बसलं होतं. तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी शहीद विजय साळसकर आणि प्रदीप शर्मा यांना गुन्हेगारी टोळ्या नष्ठ करण्याचे आदेश दिले. त्यावेळी शर्मा यांनी तब्बल ११२ गँगस्टरचा खात्मा केला.  शर्मा यांच्या नावाने अनेक गुन्हेगार कापायचे. मात्र  डाॅन लखनभैय्या  एन्काऊंटर  प्रकरणात प्रदीप शर्मा यांना अटक झाली.  पोलिस सेवेतून त्यांना निलंबित केले होते. मात्र ९ वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर त्यांना न्यायालयाने सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले. प्रदीर्घ काळानंतर सेवेत पुन्हा रूजू झालेल्या शर्मा यांची पकड आता कमी झाली असल्याचं बोलले जात असताना शर्मा यांनी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करून कमबॅक केलं. मात्र सेवेत आल्यानंतर त्यांचं मन फारसं रमलं नाही. शर्मा यांनी आपला मोर्चा आता राजकारणाकडे वळवला आहे. शर्मा यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून ते नालासोपारा येथून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं समजतं.


दया नायक

९० च्या दशकातील ८३ गुंडांना यमसदनी धाडून गुन्हेगारी जगतात दया नायक यांनी एकच खळबळ माजवली होती. मात्र, कालांतराने बेहिशेबी मालमत्तेच्या आरोप प्रकरणात अडकून दया नायक यांना पोलिस दलाबाहेरही फेकण्यात आले होते. १९९५ च्या तुकडीतील अधिकारी असलेल्या नायक यांनी अल्पावधीतच ‘चकमक’फेम अशी आपली ओळख निर्माण केली. मात्र कर्नाटक येथे आपल्या आईच्या नावे बांधलेल्या शाळेचे २००६ मध्ये सुप्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन करणं त्यांना चांगलंच भोवलं. एका पोलीस अधिकाऱ्याकडे शाळा बांधण्याएवढे पैसे आले कुठून? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला. अल्पावधीत आपल्या कामगिरीने गुंडांचा कर्दनकाळ अशी ओळख बनविलेल्या नायक यांना बेहिशेबी मालमत्तेच्या वादाने पुरते नामोहरम केले व ते मुंबई पोलीस दलाबाहेर फेकले गेले. या प्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई होऊन मुंबई पोलीस सेवेतून त्यांना निलंबित करण्यात आले. जामिनावर सुटल्यानंतर तर ते अज्ञातवासात गेले. कालांतराने न्यायालयात त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचा निकाल लागल्यानंतर नायक हे पून्हा सेवेत रूजू झाले. सध्या ते खार पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.


प्रफुल्ल भोसले

मुंबई पोलिस दलात १९८७ साली दाखल झालेले प्रफुल्ल भोसले हे पूर्वी सिटी बँकेत क्लर्क म्हणून कामाला होते. ९० च्या दशकात प्रफुल्ल भोसले यांच्या नावाचा गुन्हेगारांवर मोठा धाक होता. भोसले यांनी नाईक गँग, अरूण गवळी गँग, छोटा शकील गँगच्या ८७ कुख्यात गुंडाचे एन्काऊंटर केले.   मात्र घाटकोपर बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी ख्वाजा युनुस याच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात भोसले अडचणीत आले होते. २००३ साली घाटकोपर क्राइम ब्रँचमध्ये काम करत असताना ख्वाजा युनुसला तेथील कोठडीत ठेवले होते. त्याच्याकडून बॉम्बस्फोटाच्या कटाची माहिती घेण्यासाठी या चौघांनी थर्ड डिग्रीचा अर्थात ख्वाजाला बेदम मारल्याचा आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला होता. मात्र तसा पुरावा नसल्याचे प्रतिज्ञापत्रक सीआयडीने कोर्टात दिल्याचं समजतं.


विजय साळसकर

२६/११ मुंबई हल्‍ल्‍यात शहीद झालेले एन्‍काउंटर स्पेशलिस्ट विजय साळस्कर यांनी डॉन अरुण गवळी याच्‍या गँगचा सफाया केला होता. त्‍यांनी गँगस्टर अमर नाइक आणि सदा पावले यांना अटक केली होती. त्‍यामुळे ते चर्चेत आले होते. दरम्‍यान, एक एन्‍काउंटर करताना एका १८ वर्षीय मुलाला गोळी लागून त्‍याचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे ते वादात अडकले होते. माजी पोलिस आयुक्‍त राकेश मारिया यांच्‍या ते सर्वात आवडीचे अधिकारी होते.


सचिन वाजे

सचिन वाजे हेही मुंबई पोलिसातील एन्‍काउंटर स्पेशलिस्ट होते. त्‍यांनी छोटा राजन आणि दाऊदच्‍या अनेक गँगस्‍टर्सच्या 104 गुंडाचे एन्‍काउंटर केलं आहे. तर 312 चकमकीत वाजेंचा सहभाग होता. यांच्‍यावरही ख्वाजा युनूसला पोलिस कोठडीत मारल्‍याचा आरोप आहे. ते जेव्‍हा पोलिस निरीक्षक होते तेव्‍हा एका बनावट एन्‍काउंटर प्रकरणात त्‍यांना निलंबित करण्‍यात आलं होतं. त्‍यानंतर २००७ मध्‍ये त्‍यांनी नोकरी सोडली. नंतर शिवसेनेच्‍या माध्‍यमातून ते राजकारणात सक्रिय झाले.




हेही वाचा -

आर्थिक गुन्हे शाखा पोलिस आयुक्तांच्या रडारवर




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा