
मुंबईच्या रेल्वे नेटवर्कमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा रेल्वे पोलिसांनी (Railway Police) पर्दाफाश केला आहे. यात महिला आणि अल्पवयीन मुलींना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गर्दीचा फायदा घेऊन हे आरोपी मोबाईल चोरायचे. विशेषतः दरवाज्याजवळ किंवा प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या प्रवाशांचे फोन क्षणात हिसकावून आरोपी गर्दीत पसार व्हायचे.
तपासात समोर आले आहे की, काही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. कठोर कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी टोळ्यांमध्ये अल्पवयीन मुलींचा वापर केला जात होता. चोरी केलेले मोबाईल स्थानिक दलालांमार्फत विकले जात किंवा त्यांचे री-प्रोग्रामिंग करून पुन्हा बाजारात विक्री केली जात होती.
दरम्यान, GRP ने रेल्वे स्थानके आणि लोकल ट्रेनमध्ये देखरेख वाढवली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रवाशांच्या तक्रारींच्या आधारे संशयितांचा शोध सुरू आहे. अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून, या प्रकरणामागील संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी प्रवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, विशेषतः ट्रेनच्या दरवाज्याजवळ किंवा गर्दीच्या ठिकाणी मोबाईल वापरताना काळजी घेण्याचा इशारा दिला आहे.
हेही वाचा
