यावर्षी दहावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या कलचाचणीचा अहवाल जाहीर झाला आहे. यावर्षी वाणिज्य (कॉमर्स) शाखेकडे विद्यार्थ्यांचा कल सर्वाधिक असल्याचं दिसून आलं आहे. २०१८ साली १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिल्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परीषदेत केली.
या अहवालात महाराष्ट्रातील २ लाख ६३ हजार २०७ विद्यार्थी वाणिज्य शाखेत कल असलेले ५८ हजार ३०२ विद्यार्थी हे मुंबईचे आहेत. दहावीची परीक्षा दिलेल्या राज्यातील सुमारे २१ टक्के विद्यार्थ्यांचा कल वाणिज्य शाखेकडे असल्याचा निष्कर्ष राज्य सरकारमार्फत घेण्यात आलेल्या कलचाचणीतून समोर आला आहे. दरम्यान या कलचाचणीचा संपूर्ण अहवाल www.mahacareermitra.in या वेबसाईटवर उपलब्ध असून त्यात इतर शाखेत कल असलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या, टक्केवारी आणि क्षेत्राबद्दल माहिती उपलब्ध आहे.
कलचाचणीमध्ये मुंबई विभागातील सुमारे १७ टक्के विद्यार्थ्यांचा कल कृषी क्षेत्राकडे असल्याचं या चाचणीत समोर आलं आहे. हे प्रमाण राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. परंतु इंजिनीअरिंग क्षेत्राकडे मात्र विद्यार्थ्यांचा कल कमालीचा घटल्याचं समोर आलं आहे.
दहावीनंतर प्रत्येक विद्यार्थी आपल्या करीअरची दिशा ठरवण्यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांचा सल्ला घेत असतात. त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने कलचाचणी नावाचा एक नवा उपक्रम २०१६ ला सुरू केला होता. या उपक्रमांतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांची कल ओळखू शकणारी कलचाचणी घेण्यात येते. त्यानुसार विद्यार्थी राज्य मंडळाच्या आसन क्रमांकाच्या आधारे त्यांचा कलचाचणी अहवाल ऑनलाइन प्राप्त करू शकतात.
www.mahacareermitra.in या पोर्टलवर जाऊन मुखपृष्ठावर त्यांनी आपला बैठक क्रमांक टाकल्यानंतर त्यांना त्यांचा कलचाचणी अहवाल मिळू शकेल. हा अहवाल विद्यार्थी डाऊनलोड करू शकतात. याचसोबत त्यांचा कल ज्या क्षेत्रात आला आहे त्या क्षेत्राविषयी माहिती सांगणारा व्हिडीओ देखील ते पाहू शकतात. शिवाय प्रत्येक क्षेत्रनिहाय माहितीपर व्हिडीओ आणि प्रत्येक क्षेत्रातील तज्ञांचे मार्गदर्शन करणारे व्हिडीओही या पोर्टलवर उपलब्ध असून ज्याचा लाभही विद्यार्थी घेऊ शकतात. याचसोबत त्यांच्या आवड क्षेत्रानुसार त्यांच्या जिल्ह्यातील अभ्यासक्रमांचा शोधही त्यांना या पोर्टलद्वारे घेता येऊ शकतो. पोर्टलवर ७० हजारहून अधिक सरकारमान्य अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली आहे, असंही तावडे यांनी सांगितलं.
२०१८ मध्ये १७ लाख ३६ हजार १०४ विद्यार्थ्यांनी कलचाचणी दिली होती. दरम्यान या कलचाचणीतून विद्यार्थ्यांचे ७ विभागातील कल तपासण्यात आले. गेल्यावर्षी या कलचाचणीच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांचा सर्वात जास्त कल हा ललितकला म्हणजेच फाईन आर्ट्स क्षेत्रात सर्वाधिक दिसून आला होता.
या कलचाचणीचा उद्दिष्ट महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भवितव्य घडवले जात असल्याने त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी एकप्रकारे मदत होत आहे. तसेच त्यांना चांगल्या भविष्यासाठी शुभेच्छा देण्याचा दृष्टीकोन महाराष्ट्र शासनाचा आहे. तसेच पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये कलचाचणी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच देण्यात येणार आहे .
- शिक्षणमंत्री विनोद तावडे