विधी (लॉ) शाखेच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देत 'कॉमन एन्ट्रन्स टेस्ट' (सीईटी) संचालकांनी प्रवेशाला ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र यापेक्षा जास्त मुदतवाढ देऊ शकत नाही, असे सीईटी आयुक्तांनी उच्च न्यायालयात सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे.
विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी याआधी ५ ऑगस्ट ही तारीख देण्यात आली होती. मात्र ५ ऑगस्टपर्यंत निकाल न लागल्यामुळे १८ ऑगस्ट आणि त्यांनतर २४ ऑगस्ट अशी मुदतवाढ देण्यात आली. परंतु या मुदतीतही मुंबई विद्यापीठाचे विविध शाखांचे निकाल न लागल्याने अखेर ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र आता यापेक्षा मुदतवाढ देणे अशक्य असल्याचे अॅड. एस पटवर्धन यांनी न्यायालयात सांगितले.
पदवी अभ्यासक्रमाचा निकाल केव्हा जाहीर केला जाईल, याबाबत विद्यापीठाने कोणतीच माहिती न दिल्यामुळे, विधी शाखेला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाचा निकाल लावण्यास विलंब केल्याने विद्यार्थ्यांनी नाईलाजाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकेत निकाल लवकर लावण्यासोबतच एलएलबी प्रवेशाला मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी विद्यापीठाने खेळ केल्याचे म्हणत याचिकाकर्त्यांनी प्रत्येकी १० लाख रुपये नुकसान भरपाईची मागणीही केली आहे.
न्यायालयाने विद्यापीठाकडे २४ ऑगस्टपर्यंत किती उत्तरपत्रिका तपासून झाल्या? आणि किती राहिल्या आहेत? याची संपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
हे देखील वाचा -
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट
मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा
(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)