वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि औद्योगिकरण यामुळे शेतजमीन कमी होत चालली आहे. कमीत कमी क्षेत्रफळात पुरेसं पाणी आणि मनुष्यबळ वापरून शेती करणं शेतकऱ्यांसमोर आव्हान निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीनंही शेती करता येते हे चेंबूरमधील स्वामी मुक्तानंद हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं आहे. या विद्यार्थ्यांनी "माती विरहित शेती" या प्रकल्पातून शेतकऱ्यांच्या सेंद्रिय पिके घेण्याच्या आशा पल्लवित केल्या आहेत. या प्रकल्पाची राज्यस्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली आहे.
शिक्षण निरीक्षक मुंबई उत्तर विभाग, जिल्हा विज्ञान प्रदर्शन समिती आणि सहशालेय उपक्रम समितीने कुर्ला येथील सेंट ज्यूड हायस्कुलमध्ये आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात या प्रकल्पाची निवड केली आली.
स्वामी मुक्तानंद हायस्कुलमधील श्रुती नाळे आणि अतीश खताळ या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प बनवला आहे. यासाठी शाळेच्या विज्ञान शिक्षिका संगीता क्षीरसागर आणि शिक्षक भानुदास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
विद्यार्थ्यांनी या शेतीसाठी माती ऐवजी कोकोपीट (नारळाचा काथ्या) चा वापर केला. मातीसाठी लागणारी नांगरणी, कीटकनाशके, तण नाशके, फवारणी कोकोपीटसाठी करावी लागत नाही. ही शेती कमी जागेत, कमी पाण्यात, कमी कालावधीत करता येते. ही जैविक पद्धतीची शेती असून यासाठी कुठल्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर होत नसल्याने त्यातून पैशाची बचत होते. ही पद्धत अतिशय सोपी असल्याने ती शेतकऱ्यांना वापरणे अतिशय सोपी असल्याचेही शिक्षकांनी सांगितले.