कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दीड वर्ष बंद असलेली राज्यातील महाविद्यालये बुधवार २० ऑक्टोबरपासून सुरू झाली आहेत. मर्यादित उपस्थिती, लसवंतांनाच प्रवेश हे नियम लागू राहणार आहेत. कोरोना प्रतिबंधक लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षक-शिक्षके तर कर्मचाऱ्यांची माहिती महाविद्यालयांनी जमा केली आहे.
मात्र, सध्या ऑनलाइन सत्र परीक्षा सुरू असल्यानं अनेक महाविद्यालयांनी दिवाळीनंतरच प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, ५० टक्के उपस्थितीत वर्ग सुरू करायचे असल्यानं त्याच्या तयारीसाठी महाविद्यालयांना वेळ हवा आहे. त्यामुळे दिवाळीनंतरच महाविद्यालये विद्यार्थ्यांनी गजबजण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर ग्रामीण भागांतील काही महाविद्यालये अल्प कालावधीसाठी सुरू झाली होती. परंतु, दुसऱ्या लाटेनंतर सर्वच महाविद्यालये पुन्हा बंद झाली होती. सध्या अनेक महाविद्यालयांमध्ये पहिल्या सत्राच्या ऑनलाइन परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे बऱ्याच महाविद्यालयांनी बुधवारपासून वर्ग सुरू करण्यास असमर्थता दर्शवली आहे.
काही महाविद्यालयांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीनं संकुलात विद्यार्थी-शिक्षकांसाठी लसीकरण मोहीम राबविण्याचे नियोजन केलं आहे. मुंबई, ठाणे महापालिकेनं महाविद्यालयांना ही व्यवस्था पुरविण्याचं मान्य केलं आहे. सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, कर्मचाऱ्यांचे लसीकरण होत नाही, तोपर्यंत अनेक महाविद्यालयांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू राहणार आहेत.
सुचना:
राज्यातील ग्रामीण व शहरी भागांतील बारावीपर्यंतचे वर्ग ४ ऑक्टोबरपासूनच सुरू झाले. त्यापाठोपाठ महाविद्यालयेही सुरू होत असल्यानं केवळ शहरी भागातील ७वीपर्यंतच्या आणि ग्रामीण भागातील ४थीपर्यंतच्या शाळाच बंद आहेत. या शाळाही लवकरात लवकर सुरू कराव्या, यासाठी काही शिक्षक-पालक संघटना, शिक्षणतज्ज्ञ प्रयत्न करत आहेत. मात्र, काही शाळांमध्ये सुरू झालेल्या पहिल्या सत्राच्या ऑनलाइन परीक्षा आणि त्यापाठोपाठ येणारी दिवाळीची सुट्टी यामुळे हे वर्ग सुट्टीनंतर नोव्हेंबरमध्येच सुरू होण्याची शक्यता आहे.