राजस्थानच्या कोटा शहरात लाॅकडाऊनमुळे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील सुमारे १८०० विद्यार्थ्यांसाठी धुळे एसटी बस आगारातून रवाना झालेल्या एसटी बस कोटा शहरात पोहोचल्या आहेत. या बसचं निर्जंतुकीकरण झाल्यानंतर या बस विद्यार्थ्यांना घेऊन परतीचा प्रवास सुरू करणार आहेत.
#कोटा शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना #एसटी बसेसमधून आणताना #कोविड१९ च्या मार्गदर्शक सूचना, सुरक्षा आणि #SocialDistancing चे पूर्णपणे पालन. राज्यात परतल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करून विलगीकरणही करण्यात येणार. pic.twitter.com/mcWakyWXxD
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 30, 2020
राज्यस्तरीय प्रयत्न
कोटा शहरात अडकलेल्या सुमारे १८०० विद्यार्थ्यांना आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ७३ बस राजस्थानला पाठवण्यात आल्या आहेत. या बस धुळ्यावरून रवाना करण्यात आल्या आहेत. या बस गुरूवारी कोटा इथं पोहोचल्या. त्यानंतर या सगळ्या बसचं निर्जंतुकीकरण करण्यात आलं. या बसला पाहून विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार , परिवहन मंत्री अनिल परब यांचे आभार मानले. या विद्यार्थ्यांचा प्रवास मध्यप्रदेश तसंच गुजरात राज्यांतून होणार असल्याने मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबंधित राज्याच्या यंत्रणांशी संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या परतीच्या प्रवासाचा मार्ग मोकळा करून दिला.
#Lockdown मुळे राजस्थानच्या कोटा शहरात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना घेण्यासाठी महाराष्ट्र #एसटी महामंडळाच्या ७३ बसेस #कोटा येथे दाखल. प्रवास सुरु करण्यापूर्वी सर्व बसगाड्यांची स्वच्छता करून त्या व्यवस्थित सॅनिटाईझ केल्या जात आहेत. pic.twitter.com/dT7L9JM9Pj
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 30, 2020
पालकांचा दबाव
आयआयटी, मेडिकलच्या प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी राजस्थानमधील कोटा इथं जातात. त्यानुसार हे विद्यार्थी गेलेले असतानाच लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे इतर राज्यांतील विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्रातील जवळपास १८०० विद्यार्थी कोटामध्ये अडकून पडले. या विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी सातत्याने पालकांकडून होत असल्याने तसंच इतर राज्यांनी आपापल्या विद्यार्थ्यांना बस पाठवून परत आणल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना पुन्हा राज्यात आणण्यासाठी चर्चा केली होती. तसंच केंद्र सरकारला पत्र देखील पाठवलं होतं.