Advertisement

कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु होणार ?

जी गावं कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावांमधील १० वी तसंच १२ वीचे वर्ग सुरु करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु होणार ?
SHARES

जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता दहावी-बारावीचे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पाहावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी मंगळवारी दिले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड,  मुख्य सचिव सीताराम कुंटे,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव  वंदना कृष्णा,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड, यांच्यासह शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

खात्री देतील अशा गावांत

जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावांमधील १० वी तसंच १२ वीचे वर्ग सुरु करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

हेही वाचा- शाळा सोडल्याचा दाखला नसला तरीही दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश

शासकीय खर्चातून शिक्षण

कोरोनामुळे (coronavirus) ज्या विद्यार्थ्यांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे, अशी माहिती प्रा. वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

मूल्यांकनाचा प्रस्ताव

बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करताना सीबीएसईने जाहीर केलेल्या बारावीच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर तसंच राज्याने इयत्ता १० वी साठी मूल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली त्याचा तुलनात्मक अभ्यास करून १२ वीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करण्याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

(maharashtra cm uddhav thackeray directs to start a classes for 10th and 12th students in covid 19 free village)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा