नुकतीच विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात आल्या. पण महाराष्ट्र सरकार पुन्हा शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. देशात ओमिक्रॉनची भीती वाढत आहे. त्यामुळे राज्य पुन्हा शाळा बंद करण्याचा विचार करू शकते असं महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.
देशात सध्या ओमिक्रॉनची सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील राज्यातील शाळा महाविद्यालयांना टाळे लागले होते. त्यानंतर आता राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा शाळा बंद होण्याची शक्यता आहे.
Maharashtra | If Omicron cases continue to rise, we may take a call to shut the schools again. We are monitoring the situation: School Education minister Prof. Varsha Eknath Gaikwad to ANI
— ANI (@ANI) December 22, 2021
(file photo) pic.twitter.com/9EDsOuAnw3
देशातील एकूण २१३ ओमायक्रॉन प्रकरणांपैकी महाराष्ट्रात ५४ रुग्णांची नोंद केली गेली आहे. पत्रकारांशी बोलताना गायकवाड यांनी सांगितलं की प्रकरणे वाढत राहिल्यास सरकार पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.
“ओमिक्रॉनची प्रकरणे वाढत राहिल्यास, आम्ही पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत,” असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
दरम्यान, काही राज्यांमध्ये ओमिक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं केंद्र सरकारनं राज्य सरकारांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. तिचे पालन करण्याचे निर्देश सर्वच राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी राज्यांसाठी विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. रुग्णवाढीचा दर अधिक असलेल्या जिल्ह्यांमध्ये निर्बंधांसाठी धोरणे राबवण्याच्या शिफारशी करण्यात आल्याचं भूषण यांनी सांगितलं.
आरोग्य मंत्रालयानं राज्यांना पत्र पाठवलं असून स्थानिक परिस्थितीनुसार काळजी घ्यावी असं सांगितलं आहे. तसंच गरज लागल्यास मार्गदर्शक तत्वे जाहीर करावी असंही म्हटलं आहे.
गेल्या आठवड्यातील पॉझिटिव्हीटी रेट १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास किंवा ऑक्सिजन तसंच आयसीयू बेडसाठी ४० टक्के व्याप्ती असेल तर ही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली जाऊ शकतात असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.