मुंबईत युनिव्हर्सिटीच्या पेपर तपासणीच्या अभूतपूर्व गोंधळामुळे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण क्षेत्र भलतंच चर्चेत आलं आहे. मात्र त्यातच आता एका नवीन चर्चेची भर पडली आहे. आणि ती म्हणजे विद्यापीठांच्या नावाची!
अभिमत विद्यापीठांना स्वायत्त दर्जा असतो. त्यामुळे अशा विद्यापीठांना राज्यांचे नियम लागू होत नाहीत. विशेषत: प्रवेशशुल्क आणि प्रवेशविषयक नियम स्वत: ठरवण्याचा अधिकार अशा विद्यापीठांना असतो. मात्र, सध्या देशभरात आणि मुंबईतही अशी अनेक विद्यापीठे आहेत, जे नावापुढे 'अभिमत विद्यापीठ' असा उल्लेखच करत नाहीत. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मोठा गोंधळ उडतो. शिवाय अऩेकदा, माहितीच नसल्यामुळे चुकीच्या किंवा इच्छा नसलेल्या विद्यापीठात प्रवेश घेतला जाण्याचेही प्रकार घडतात.
दरम्यान, या सर्व गोंधळामुळे देशभरातल्या सर्व अभिमत विद्यापीठांनी तसा उल्लेख स्वत:च्या नावात करावा असे आदेश युजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी तसे आदेश देण्यासंबंधी युजीसीला ताकीद दिली होती.
युजीसीच्या यादीनुसार देशभरात एकूण १२३ अभिमत विद्यापीठे आहेत. त्यापैकी ८ विद्यापीठे मुंबईत आहेत. या विद्यापीठांनी त्वरीत आदेशांवर कार्यवाही न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल असेही युजीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात तातडीने पावले उचलून पुढील 15 दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याबाबतही युजीसीने बजावले आहे. या आदेशांनुसार विद्यापीठांनी आपल्या नावापुढे कंसात 'अभिमत' असा शब्द वापरणे बंधनकारक आहे.
हेही वाचा