Advertisement

कोई नहीं चलाता और तीर चल रहे हैं...

लता मंगेशकर म्हणजे जगभरातल्या संगीतप्रेमींच्या लाडक्या लतादीदी... दीदींच्या जादुई आवाजाचं कोडं अद्याप कुणालाही सुटलेलं नाही. उतारवयातही दीदींचा आवाजा ऐन तारुण्यात आलेल्या कोणत्याही नायिकेला शोभावा ही दैवी देणगीच म्हणावी लागेल. मागील आठ दशकं संगीताची सेवा करत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लतादीदींनी ३० पेक्षाही अधिक भारतीय भाषांमध्ये गायन करत विश्वविक्रम केला आहे.

कोई नहीं चलाता और तीर चल रहे हैं...
SHARES

‘आएगा... आएगा आनेवाला...’ यांसारखी असंख्य गाणी आपल्या समधूर गायकीने अजरामर करणाऱ्या गानकोकीळा भारतरत्न लतादीदी मंगेशकर यांनी खरोखर आपल्या गायकीने रसिकांच्या मनावर प्रेमाचे तीर चालवले आहेत. ८९ वर्ष पूर्ण करून ९० व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या लतादीदींना ‘मुंबई लाइव्ह’चा मानाचा मुजरा आणि दीर्घ आरोग्यासाठी प्रार्थना...



संगीतप्रेमींच्या लाडक्या लतादीदी

लता मंगेशकर म्हणजे जगभरातल्या संगीतप्रेमींच्या लाडक्या लतादीदी... दीदींच्या जादुई आवाजाचं कोडं अद्याप कुणालाही सुटलेलं नाही. उतारवयातही दीदींचा आवाजा ऐन तारुण्यात आलेल्या कोणत्याही नायिकेला शोभावा ही दैवी देणगीच म्हणावी लागेल. मागील आठ दशकं संगीताची सेवा करत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या लतादीदींनी ३० पेक्षाही अधिक भारतीय भाषांमध्ये गायन करत विश्वविक्रम केला आहे. प्रचंड मेहनत आणि रियाजाच्या बळावर लतादीदींनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मा. दीनानाथ मंगेशकरांचा वारसा पुढे सुरू ठेवला.


पाच भावंडांमध्ये थोरल्या असलेल्या दीदींनी वडिलांच्या पश्चात मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ या चार भावडांची जबाबदारी यशस्वीपणे स्वीकारत आपलं करियरही घडवलं आणि भावंडांना मार्गदर्शनही केलं. खरं तर दीदींचं जन्मजात नाव हेमा, पण नंतर त्यांच्या वडिलांनी ‘भावबंधन’ या नाटकातील लतिका या व्यक्तिरेखेवरून त्यांचं नाव लता असं ठेवलं. का कुणास ठाऊक ही लतिका भविष्यात गगनालाही गवसणी घालणार असल्याची चाहूल कदाचित त्यांना आधीच लागली असावी.


पाचव्या वर्षीच अभिनयाला सुरुवात

दीदींनी पाचव्या वर्षीच चेहऱ्याला मेकअप करून वडिलांसोबत अभिनयाला प्रारंभ केला. दीदींना गायन करायचं होतं, पण शास्त्रीय संगीताचे चाहते असलेल्या त्यांच्या वडिलांना सिनेमात गाणी गाणं आवडत नसे, पण त्यांच्या पश्चात खालावलेल्या आर्थिक परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी दीदींना पार्श्वगायनाच्या दिशेनेच वाटचाल करावी लागली. दीनानाथ मंगेशकरांच्या निधनानंतर अचानक आलेली कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यासाठी तसंच अर्थार्जनासाठी दीदींनी लहानसहान भूमिकाही साकारल्या.


१९४२ मध्ये जेव्हा वडिलांचं छत्र हरवलं, तेव्हा दीदी केवळ १३ वर्षांच्या होत्या. त्यावेळी दीनानाथांचे जवळचे मित्र आणि नवयुग चित्रपट संस्थेचे मालक विनायक कर्नाटकी यांनी मंगेशकर कुटुंबाला आधार दिला. त्यामुळे दीदींना अभिनय आणि गायन करण्याच्या संधी मिळू लागल्या. १९४२ मध्ये आलेल्या ‘किती हसाल’ या चित्रपटात दीदींना ‘नाचू या गडे...’ हे गाणं गाण्याची संधी मिळाली, पण फायनल कटमध्येही गाणं वगळण्यात आलं. याच वर्षी दीदींनी ‘पहिली मंगळागौर’ या सिनेमात ‘नटली चैत्राची नवलाई...’ हे गाणं गायलं. इथून मग दीदींनी शिक्षण, गायन आणि कुटुंब अशी तिहेरी जबाबदारी पार पाडत यशस्वी कारकीर्द घडवली.


यांच्याकडून घेतले संगीताचे धडे

पुण्याहून मुंबईत आल्यावर त्यांनी भेंडीबाजार घराण्याचे गायक उस्ताद अमन अली खान यांच्याकडून भारतीय शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. त्यानंतर त्यांना दिग्दर्शक वसंत जोगळेकरांच्या ‘आपकी सेवा में’ या सिनेमात हिंदी गाणं गाण्याची संधी मिळाली. दत्ता डावजेकरांनी या गाण्याला संगीत दिलं होतं. ४०च्या दशकात सुरुवात आणि नंतरच्या प्रत्येक दशकात गायन आणि संगीत क्षेत्रात घडणारे बदल आनंदाने स्वीकारत दीदींनी स्वत:सोबतच आपल्या गायनशैलीतही आमूलाग्र बदल घडवले. याच कारणामुळे २०१० मध्येही त्यांच्या गायनाची जादू कायम राहिली.


पुरस्कारांच्या मागे न धावता पुरस्कार त्यांच्या पायाशी लोळणं घेऊ लागले. पद्मभूषण, पद्म विभूषण, दादासाहेब फाळके, महाराष्ट्र भूषण, तीन राष्ट्रीय पुरस्कारांसह दीदींना देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न या पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. सर्वाधिक सोलो गाणी गायल्याबद्दल गिनीस बुक आॅफ रेकॅार्ड्समध्येही दीदींच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.


मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश, मन्ना डे, हेमंत कुमार, महेंद्र कपूर, आशा भोसले, सुरैय्या, उषा मंगेशकर, शब्बीर कुमार, शैलेंद्र सिंग, नितीन मुकेश, मनहर उधास, अमित कुमार, मो. अझीझ, विनोद राठोड, एस. पी. बालसुब्रम्हण्यम, पंकज उधास, अभिजीत भट्टाचार्य, उदित नारायण, कुमार सानू, सुरेश वाडकर या दिग्गज गायकांसोबतच त्यांनी आजच्या पिढीतील सोनू निगम, गुरदास मान, अदनान सामी, ए. आर. रेहमान आदींसोबतही गायन केलं.


सिनेनिर्मितीही  

गायनासोबतच त्यांनी संगीत दिग्दर्शन आणि सिनेनिर्मितीतही हात आजमावला. आनंदघन या नावाने संगीत देत दीदींनी ‘राम राम पाव्हणं’, ‘मराठा तितुका मिळवावा’, ‘मोहित्यांची मंजूळा’, ‘साधी माणसं’, ‘तांबडी माती’ या सिनेमांना संगीत दिलं.

‘साधी माणसं’मधील ‘ऐरणीच्या देवा...’ या गाण्यासाठी त्यांना राज्य सरकारच्या वतीने सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून गौरवण्यात आलं. ‘वादळ’ या मराठी सिनेमासोबत दीदींनी ‘झांझर’, ‘कांचन’ आणि ‘लेकिन’ या हिंदी सिनेमांचीही निर्मिती केली होती.

एकूणच दीदींनी निसर्गाकडून लाभलेलं सारं काही जगाला भरभरून दिलं. त्यांनी गायलेली हजारो गाणी अजरामर असून, दीदींच्या सुमधूर गायकीचे तीर आचंद्र सूर्य संगीतप्रेमींना घायाळ करत राहतील यात दुमत नाही.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा