Advertisement

अशी धम्माल फक्त 'इथे'च पहायला मिळू शकते!


अशी धम्माल फक्त 'इथे'च पहायला मिळू शकते!
SHARES

‘उत्सव नात्यांचा...नवतारुण्याचा’अशी संकल्पना घेऊन नुकताच 'झी मराठी अवॉर्ड्स'चा सोहळा अतिशय रंगतदार पद्धतीने पार पडला. ज्यामध्ये १० पुरस्कार पटकावत ‘लागिरं झालं जी’ने बाजी मारली. त्यापाठोपाठ ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेनेही सात पुरस्कार मिळवत सोहळ्यावर आपला ठसा उमटवला. 'झी मराठी अवॉर्ड्स' हे प्रेक्षकांनी दिलेल्या मतांवरून दिले जातात. राज्यातील २२ शहरांमधून झालेल्या या मतदान प्रक्रियेसाठी प्रत्यक्ष, फेसबुकद्वारे, वेबसाईटवरुन आणि मिस्ड् कॉल असे चार पर्याय ठेवण्यात आले होते. या सर्व माध्यमातून प्रेक्षकांनी १२ लाखांच्यावर मतांचा पाऊस पाडत भरभरून प्रतिसाद दिला.



झी मराठीच्या मालिकांमधील कलाकारांचे रंगतदार नृत्य सादरीकरण, 'चला हवा येऊ द्या'च्या कलाकारांनी उडवून दिलेली धम्माल आणि जोडीला संजय मोने आणि अतुल परचुरेसारख्या अनुभवी कलाकारांनी आपल्या निवेदनातून केलेल्या तुफान फटकेबाजीने हा कार्यक्रम उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला.



या सोहळ्यात कोणती व्यक्तिरेखा सर्वोत्कृष्ट ठरणार? लोकप्रिय नायक, नायिकेच्या पुरस्काराची विजयी माळ कुणाच्या गळ्यात पडणार? लोकप्रिय मालिकेचा मान कुणाला मिळणार? असे उत्सुकतापूर्ण प्रश्न सर्वांच्या मनात असतात. अशीच उत्सुकता यंदाही होती. यावर्षी ‘लागिरं झालं जी’ आणि ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगणार असं चित्र सुरुवातीपासूनच निर्माण झालं होतं.



‘लागिरं झालं जी’ या मालिकेने सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत, सर्वोत्कृष्ट सहाय्यक स्त्री आणि पुरुष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट बाल कलाकार, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट आजी, सर्वोत्कृष्ट वडील, सर्वोत्कृष्ट नायिका असे पुरस्कार पटकावत या सोहळ्यावर आपली ठसठशीत मोहोर उमटवली. तर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सर्वोत्कृष्ट भावंडं, सर्वोत्कृष्ट सासरे, सर्वोत्कृष्ट आई, सर्वोत्कृष्ट सून, सर्वोत्कृष्ट कुटुंब आणि सर्वोत्कृष्ट नायक असे पुरस्कार मिळवत सोहळ्यावर आपली छाप सोडली. यंदाचा सर्वोत्कृष्ट मालिकेच्या पुरस्कारांसाठीही या दोन मालिकांमध्ये जोरदार चुरस रंगली. मात्र, प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा समसमान होता. त्यामुळे या दोन्ही मालिकांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला.



यावर्षीच्या सोहळ्याची शान ठरली ते यात सादर झालेले रंगतदार परफॉर्मन्स. यातही लक्षवेधी ठरली ती प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोत्रीने सादर केलेली कव्वाली. ‘युं ही सौ साल तक झी मराठी हम भी देखेंगे’ म्हणत या दोघांनी ही कव्वाली सादर करत एकच धम्माल उडवून दिली. तर अजिंक्य-शितल, राणा-अंजली, समीर-मीरा, नीरज-नुपूर या जोड्यांचा रंगतदार डान्स आणि मल्लिका-जुई, राधिका-शनाया, भानू-शोभामधील टशन दाखवणा-या डान्स परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली. याशिवाय ‘चला हवा येऊ द्या’च्या टीमने सादर केलेल्या स्किटने प्रेक्षकांना खळखळून हसवले. कलाकारांसोबतच सूत्रसंचालक संजय मोने आणि अतुल परचुरेंनी विनोदाचं अचूक टायमिंग साधत आपल्या खुमासदार निवेदनाने हा सोहळा अधिकच रंगतदार बनवला.



येत्या १५ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा. झी मराठी वाहिनीवर हा सोहळा प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

श्रीदेवीचा हा लुक तुम्हाला घायाळ करून सोडेल!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा