मुंबई उच्च न्यायालयानं ६५ वर्षाच्या वरील जेष्ठ कलाकारांना टिव्ही मालिका आणि इतर शूटसाठी सेटवर येण्यावर घातलेली बंदी रद्द केली आहे. लॉकडाऊनच्या काळात शूटिंगबाबत महाराष्ट्र सरकारने गाईडलाइनसोबत शूटिंगला परवानगी दिली होती. मात्र, ६५ वर्षांवरील कलाकार, टेक्निशियन आणि डायरेक्टर तसेच कोणत्याही क्रिएटिव्ह व्यक्तीला शूटिंगसाठी सेटवर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारचा आदेश रद्द केला आहे.
कोरोनाच्या काळात जर ही मंडळी थोडे दिवस सक्तीनं घरी बसले तर ते त्यांच्या आरोग्यसाठी लाभदायक आहे, असं स्पष्टीकरण राज्य सरकारच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आलं होतं. मात्र राज्य सरकारचे हे नियम जाचक असल्याचा दावा याचिकाकर्त्यांच्यावतीनं करण्यात आला. हायकोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर याचिकाकर्त्यांच्याबाजूनं आपला निकाल जाहीर केला.
राज्य सरकारकडून ३० मे रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकातील मार्गदर्शक तत्वांनुसार ६५ वर्ष आणि त्यावरील वयोमान असलेल्या कलाकारांना चित्रीकरणाच्या ठिकाणी बंदी घालण्यात आला आहे. या परिपत्रकाविरोधात ज्येष्ठ कलावंत प्रमोद पांडे (७०) आणि इंडियन मोशन पिच्चरर्स प्रोड्युसर्स असोसिएशन (इंपा) यांनी हायकोर्टात रीट याचिका दाखल केली होती. या मुद्द्यावरून बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती. याचिकेवर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. या याचिकेवर मुंबई हायकोर्टानं ६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगपासून रोखण्याचा सरकारचा निर्णय रद्द ठरवला आहे.
नागरिकांना दुकानं उघडून त्यांचे दैनंदिन व्यवहार करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मग कोणत्या आधारावर ६५ वर्षांपेक्षा अधिक वयोमान असलेल्या कलाकारांना काम करण्यापासून रोखण्यात आले?, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला होता. शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त असतानाही ज्येष्ठ कलाकारांना चित्रीकरण करण्यापासून रोखणं योग्य नसल्याचं मतही हायकोर्टानं नोंदवलं.
हेही वाचा