टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या चाहत्यांसाठी एक सरप्राइज आहे. अनुष्का आणि विराट हे लवबर्ल्ड्स लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. याचवर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये त्यांचा विवाह पार पडणार आहे. ९,१०,११ आणि १२ डिसेंबर असे चार दिवस विवाहसोहळा रंगणार आहे. विशेष म्हणजे इटलीतल्या मिलान इथं या दोघांचे शुभमंगल होणार आहे. दोघांचं लग्न हे हिंदू पद्धतीनं होणार असल्याचं बोललं जातं आहे. यासंदर्भात कुठलीच अधिकृत घोषणा करण्यात आली नाही आहे.
येत्या १० डिसेंबरपासून श्रीलंका-भारत यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. मात्र विराटला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, विराटनं बीसीसीआयकडे सुट्टीसाठी अर्ज केला होता. अर्जात विराटनं सुट्टीचं कारण खाजगी असल्याचं म्हटलं होतं.
फक्त एवढंच नाही तर अनुष्कानं डिसेंबरमध्ये शूटिंग करमार नसल्याचं निर्माता-दिग्दर्शकांना आधीच बजावलं होतं. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू होत्या.