'मोहम्मद रफी हे संगीतातील गंधर्व अवतार होते. ते जेवढे मोठे गायक होते, तेवढेच ते व्यक्ती म्हणूनही मोठे होते', अशा शब्दांत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी मोहम्मद रफी यांचा गौरव केला. तर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनीही 'असा मोहम्मद रफी पुन्हा होणे नाही', अशा शब्दांत त्यांच्याबद्दल मनस्वी आदर भावना व्यक्त केल्या.
'स्पंदन आर्ट' या संस्थेतर्फे देण्यात येणारा मोहम्मद रफी पुरस्कार वितरण सोहळा रविवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात पार पडला. या पुरस्कार सोहळ्याचं उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झालं. यावेळी राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्यासह राज्याचे सांस्कृतीक मंत्री विनोद तावडे, मोहम्मद रफी यांच्या यास्मिन आणि नसरीन या दोन मुली, तसंच अॅड प्रतिमा शेलार आणि स्पंदन आर्टचे संस्थापक अध्यक्ष आमदार आशिष शेलार उपस्थित होते.
सन २०१७ चा दहाव्या वर्षीचा महोम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार संगीतकार श्रीकांत ठाकरे यांना मरणोत्तर देण्यात आला. त्यावेळी श्रीकांत यांच्या पत्नी मधुवंती ठाकरे यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. एक लाख रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. तर यावेळचा मोहम्मद रफी पुरस्कार गायिका पुनम श्रेष्ठा यांना देण्यात आला. ५१ हजार रुपयांचा धनादेश स्मृतिचिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप होतं.
यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पुरस्कार प्राप्त दोघांचे अभिनंदन करत 'मोहम्मद रफी यांच्यासारखा महान कलावंत पुन्हा होणे नाही' अशा शब्दांत रफी यांचा गौरव केला.