
भारतीय हवामान विभागाने (IMD) अतिवृष्टी आणि वेगवान वाऱ्याचा इशारा दिल्यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला होता. पावसामुळे झाडे उन्मळून पडणे, फांद्या तुटणे आणि इतर अपघातांचा धोका वाढल्याने उद्याने बंद ठेवण्यात आली होती.
महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरातील सर्व उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वच्छता, दुरुस्ती आणि सुरक्षा तपासणी सुरू केली आहे. पडलेली झाडे, तुटलेल्या फांद्या आणि धोकादायक अवशेष हटवण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. कमकुवत झाडे, लोंबकळणाऱ्या फांद्या आणि इतर धोकादायक ठिकाणांची तपासणी सुरू आहे.
महापालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सोमवारपासून किंवा पुढील आठवड्याच्या मध्यापर्यंत टप्प्याटप्प्याने उद्याने नागरिकांसाठी खुली करण्यात येतील. मात्र, प्रत्येक उद्यानाची सुरक्षा पूर्णपणे सुनिश्चित झाल्यानंतरच प्रवेश दिला जाईल.
यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या दोन आठवड्यांत झाडे पडून एका चिमुकल्यासह तीन जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. सततचा पाऊस, पाण्याने सैल झालेली माती आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडे कमकुवत झाल्याने अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.
6 जुलै रोजी अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला गार्डन क्रमांक 2 मध्ये सिमेंटची शीट कोसळून दोन ज्येष्ठ महिला जखमी झाल्या होत्या. त्यावेळी एक व्यक्ती योगाभ्यास करत होती.
जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर केवळ झाडेच नव्हे, तर उद्यानांतील इतर पायाभूत सुविधांचीही तपासणी करण्याची गरज अधोरेखित झाली.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, 1 जुलैपासून आतापर्यंत झाडे आणि फांद्या पडल्याच्या 1,700 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे.
5 जुलै: 523 झाडे/फांद्या पडल्याच्या तक्रारी
6 जुलै: 428 तक्रारी
या वाढत्या घटनांमुळे महापालिकेची पथके युद्धपातळीवर झाडे हटविणे आणि परिसर सुरक्षित करण्याचे काम करत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत उद्याने पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू आहे.
हेही वाचा
