तमिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर मुंबईच्या दिशेनं निघालेल्या ओखी वादळाने डहाणू, सूरतकडे मोर्चा वळवल्याने मुंबईवरचं मोठं संकट टळलं आहे. असं असलं तरी वादळाच्या परिणामाने शहरात प्रति तास ५० ते ७० किमी वेगाने वारे वाहून येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
ओखी वादळ कोकण आणि मुंबईच्या किनारपट्टीवर येऊन धडकण्याची शक्यता व्यक्त करत हवामान खात्याने सावधगिरीचा इशारा दिला होता. परंतु वादळाने मुंबईपासून काही मैल अंतरावर आपला मार्ग बदलून डहाणू आणि सूरतच्या दिशेने आपला मोर्चा वळवला आहे. त्यामुळे मुंबईकरील धोका टळला आहे.
मात्र, मुंबईच्या किनारपट्टीपासून ५५० किमी अंतरावर असलेल्या ओखी वादळाने मुंबईवर पावसाचे ढग निर्माण झाले आहेत. परिणामाने शहरांत येत्या २४ तासांत जोरदार वाऱ्यासहित मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार कुलाबा, वरळी, प्रभादेवी, दादर, माटुंगा भागात तुरळक सरीही पडल्या. नवी मुंबई, ठाण्यातही पाऊस पडला. मंगळवार आणि बुधवारी पावसाचा जोर वाढेल, असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
ओखी वादळाच्या वृत्ताने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, चौपाटीवर जाणं २ दिवसं तरी टाळा, मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असं आवाहन हवामान खात्याने केलं आहे.