Advertisement

मुंबईत वाढते ओझोन प्रदूषण

आरोग्याला गंभीर धोका

मुंबईत वाढते ओझोन प्रदूषण
SHARES

ग्राउंड-लेव्हल ओझोन (O₃) हे हिवाळ्यात मुंबईतील प्रमुख प्रदूषक ठरले आहे, असे CPCB च्या आकडेवारीत दिसून येते. हा घातक वायू वाहनं, उद्योग आणि वीज निर्मिती केंद्रांतून निघणाऱ्या नायट्रोजन ऑक्साईड (NOₓ) आणि VOCs यांच्या सूर्यप्रकाशात होणाऱ्या अभिक्रियांमुळे तयार होतो. 

मागील महिन्यापासून बहुतेक दिवस AQI मध्ये ओझोनचे प्रमाण अधिक असल्याचे पाहायला मिळाले. गेल्या वर्षीही हाच कल दिसला होता.

गुरुवारी मुंबईचा सरासरी AQI 130 वरून 142 वर गेला. यामध्ये NO₂ म्हणजेच वाहन आणि औद्योगिक प्रदूषणाचा मोठा वाटा होता. बीकेसी, देवनार, कुलाबा आणि शिवडी येथे AQI ‘खराब’ श्रेणीमध्ये होता. मझगाव, खेरवाडी, बोरिवली, गोवंडी येथे AQI ‘असमाधानकारक’ स्तराच्या वर होता.

तज्ज्ञ सांगतात की, वरच्या वातावरणातील ओझोन संरक्षण करते, पण जमिनीवरील ओझोन अत्यंत विषारी आहे. हे मुलांसाठी, ज्येष्ठांसाठी आणि दम्याच्या रुग्णांसाठी धोकादायक आहे.

राज्य पर्यावरण विभागानुसार, NOₓ आणि VOCs यांच्यावर सूर्यप्रकाशात प्रतिक्रिया होते. त्यातून शहरी स्मॉगमधील ओझोन तयार होते. मुंबईत उष्णता आणि सूर्यप्रकाश जास्त असल्याने हे प्रमाण वाढते.

तज्ज्ञ म्हणतात की, दाट वाहतूक, चेंबूर–ट्रॉम्बेतल्या रिफायनरी आणि किनारी आर्द्रता यामुळे हिवाळ्यात ओझोनचे प्रमाण वाढते. CPCB आणि MPCB ने WHO च्या सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त ओझोन पातळी वारंवार नोंदवली आहे.

डॉक्टर सांगतात की, यामुळे घसा खवखवणे, खोकला आणि श्वास लागणे असे आजार होतात. या हवेशी दीर्घ संपर्क फुफ्फुसांवर परिणाम करतो. मुलं, वृद्ध आणि बाहेर काम करणारे सर्वाधिक धोक्यात आहेत.

डॉ. संकेत जैन म्हणतात की, भारतात दरवर्षी 2.1 मिलियन लोक हवेच्या प्रदूषणामुळे मरतात. मुंबईत O₃, NO₂ आणि PM2.5 च्या संपर्काने मृत्यूदर वेगाने वाढतो. उच्च प्रदूषण, आरोग्यसेवेचा अभाव आणि दाट लोकसंख्या या कारणांमुळे धोका अधिक वाढतो.

ते म्हणाले की, प्रदूषित हवा दमा, COPD, ब्राँकायटिस, हृदयविकार, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब वाढवते. मेंदूचे नुकसान, गर्भधारणेतील समस्या आणि अकाली प्रसूतीशीही प्रदूषणाचा संबंध आढळतो.

पर्यावरण विभागानुसार, तीव्र सूर्यप्रकाश, आर्द्रता आणि कमी वाऱ्याचा वेग ओझोन वाढवतात. अंधेरी, बांद्रा आणि चेंबूर येथे अशा स्पाईक्स अधिक दिसतात.

अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रदूषण कमी करण्यासाठी वाहन आणि उद्योगांचे उत्सर्जन कमी करणे, VOC नियंत्रण, सार्वजनिक वाहतूक वाढवणे, ई-वाहनांना प्रोत्साहन देणे आणि शहरात झाडे अधिक लावणे हे गरजेचे आहे.



हेही वाचा

गोराई, दहिसर येथे ट्विन मॅन्ग्रोव्ह पार्क

ऑक्टोबरमध्ये मुंबईतील 2025 ची सर्वाधिक प्रदूषित हवेची नोंद

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा