तापमानात झालेल्या बदलांमुळं मुंबईकरांच्या तब्येतीत बिघाड झाल्याचं पाहायला मिळत आहे. तापमानात झालेला बदल, दिवाळीतील फटाक्यांचा धूर, वाढते प्रदूषण, फराळ-मिठाई अशा गोड आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन यामुळं मुंबईकरांच्या घशातील खवखव वाढली आहे. कोरडा खोकला, घसादुखी, सर्दी यामुळं अनेकांचा आवाज बसला आहे.
सर्दी, खोकला, या तक्रारींचे प्रमाण जास्त आहे. सुरुवातीला सर्दी, खोकल्यावर घरगुती काढे आणि उपचार घेतले जातात. मात्र खोकला न थांबल्यास औषधविक्रेत्यांकडून औषधे आणली जातात, त्यामुळे हा त्रास वाढत जातो.
हे लक्षात ठेवा
- सतत खोकला येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
- वेगवेगळ्या प्रकारची औषधे स्वत:हून घेऊ नका.
- काढ्याच्या उष्णतेमुळे अन्य त्रास होऊ शकतात.
- कोणत्या घटकांची अॅलर्जी आहे का हे पाहा, तपासण्या करून घ्या.
- तापमानातील बदलानुसार आहारामध्ये बदल करा.
- ज्या मास्कचा वापर न धुता सतत केला जातो, त्यातूनही संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- वैद्यकीय उपचार लांबणीवर टाकू नका.
- मुलांना पूर्वी जी औषधे दिली आहेत तीच औषधे पुन्हा देऊ नका.
- डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- तेलकट, मसालेदार पदार्थाचा अतिरेक नको
- दिलेल्या औषधांचा कोर्स पूर्ण करा.
- खोकल्यामुळे काहीजणांना लघवीवरील नियंत्रण जाते, छातीत वेदना होतात ही सारी लक्षणे डॉक्टरांना सांगा.