यंदा पाऊस अधिक काळ लांबल्याने ऑक्टोबर हिटची तीव्र झळ बसली नाही. पण वातावरणात मात्र विचित्र बदल दिसून आला. सकाळी गारवा जाणवतो. तर दुपारी उन्हाचे चटके आणि संध्याकाळी मळभ दाटून येते. अशा तिन्ही ऋतूतील वातावरणामुळे मात्र मुंबईकरांचं आरोग्य बिघडलं आहे. सर्दी-खोकला, तापामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत.
नोव्हेंबर महिना सुरू झाल्यानंतरही अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे वातावरणात सातत्याने बदल होत आहे. या बदलाचा त्रास लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना सर्वाधिक होत आहे. ताप, डोकेदुखी, सर्दी, घसादुखी आदींमुळे सर्वच हैराण झाले आहेत. मुंबईमध्ये स्वाइन फ्लू, डेंग्यू यासारख्या आजारांनीही डोके वर काढले आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढले आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाला आहे.
राज्यात स्वाइन फ्लूमुळे २४० जण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्यात जानेवारी महिन्यापासून २७ लाख १५ हजार रुग्णांची स्वाइन फ्लूची तपासणी करण्यात आली. डेंग्यू, व्हायरल संसर्गाच्या तापाचे रुग्ण वाढले आहेत. राज्यभरात अशा ४० हजार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. १ जानेवारी ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीमध्ये राज्यात ९ हजार ८९९ डेंग्यूच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामधील १२ जणांचा मृत्यू डेंग्यूमुळे झाला आहे.
हेही वाचा -
जे.जे. रुग्णालयात आता बिल ऑनलाइन भरता येणार
स्वाइन फ्लूचे राज्यात २४० बळी, मुंबईत ६ जणांचा मृत्यू