महाराष्ट्र राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५९ झाल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी दिली. शुक्रवारी मुंबईत ५ आणि नागपूरमध्ये १ असे एकूण ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसंच आतापर्यंत एकूण २८ रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत, असंही टोपे यांनी सांगितलं.
राज्यातील एकूण १५९ रुग्णांपैकी ५८ रुग्ण हे मुंबईतील असून त्यातील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई शहरात सद्यस्थितीत ३४७ व्यक्ती होम कॉरंटाईन आहेत.
The current count of COVID19 patients in the state of Maharashtra is 159.
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 28, 2020
Yesterday, Mumbai 05 & Nagpur 01, such 06 people have been identified as positive.Till date 28 people from these have been recovered and are discharged from the respective hospitals. #CoronaVirusUpdates
सल्ल्याकडे दुर्लक्ष
महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच नागरिकांना घरातच थांबून, कोरोनाला रोखा असं आवाहन करण्यात येत आहे. परदेशातून आलेल्या तसंच कोरोना संशयितांनाही घरातच विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला जात आहे. परंतु हा सल्ला काही लोकं पाळत नसल्याने महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या वाढते आहे. ही निश्चितच चिंतेची बाब असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
६० टक्के रुग्ण परदेशवारीचे
कोरोनाची लागण झालेल्या मुंबई परिसरातील एकूण रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण हे परदेशातून जाऊन आले होते. त्यांच्यापासून त्यांचे कुटुंबिय, मित्रमंडळी आणि इतर संपर्कात आलेल्या लोकांनाही कोरोनाची लागण झाली. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरू न जाता हा व्हायरस आणखी पसरू नये म्हणून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करा, घरातच राहा, असं आवाहन मुंबई महापालिकेच्या उप मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी केलं आहे.