सिंगापूर आतरराष्ट्रीय विमानतळावर अडकलेल्या ६० विद्यार्थ्यांना मुंबईत आणण्यात आलं. गुरुवारी रात्री या विद्यार्थ्यांना मुंबईत आणलं गेलं. कोरोना व्हायरसच्या उद्रेकानंतर ते सिगांपूर विमानतळावर अडकडून होते. भारत सरकारकडे त्यांनी व्हिडिओ द्वारे भारतात आणण्याची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना भारतात आणलं गेलं.
बरेच विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. सिंगापूर एअरलाइन्सच्या विमानानं हे विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. ६० विद्यार्थ्यांपैकी ४० विद्यार्थी हे महाराष्ट्रातील आहेत. तर उर्वरीत २० विद्यार्थी इतर राज्यातील आहेत.
"बहुतेक विद्यार्थी फिलीपिन्समध्ये वैद्यकीय अभ्यासक्रम शिकत होते. ते सिंगापूरला गेले होते. पण त्यांना भारतात परतण्यासाठी उड्डाण उपलब्ध नसल्यानं त्यांना दीड दिवस विमानतळावर घालवावा लागला," एका विद्यार्थ्याच्या नातेवाईकानं एका वृत्तपत्राला ही माहिती दिली.
विद्यार्थ्यांना प्रथम इमिग्रेशन तपासणीतून जावे लागेल. एकदा ते पूर्ण झाल्यावर ६० विद्यार्थ्यांची तपासणी केली जाईल. तपासणी केल्यानंतर यांचे रिपोर्ट नेगिटिव्ह आले तरी सुद्धा त्यांना १४ दिवस क्वारंटाईन होण्यास सांगितलं जाऊ शकतं.
कोरोनाव्हायरसची मुंबईत ११ रुग्ण आहेत. त्यामुळे राज्य सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) कोविड -१९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत. आखाती देशांतील २६ हजार नागरिक भारतात येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आगमनापूर्वी महानगरपालिका सर्व सुविधा आणि क्वारंटाईन ठेवण्यासाठी जागा उपलब्ध करत आहे.
मुंबई विमानतळाजवळील काही हॉटेलमध्ये पालिकेनं क्वारंटाईन करण्याची सुविधा सुरू करणार असल्याचं वृत्त आहे. एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, नागरी संस्थेनं कमीतकमी १० शहरांच्या रुग्णालयात वेगवेगळे वॉर्ड उघडण्याचा निर्णय घेतला आहे. असं म्हटलं जात आहे की, मार्चअखेरीस आणखी १५ हजार लोक अमेरिकेतून येण्याची अपेक्षा आहे. आखाती देश आणि अमेरिका या दोन्ही देशांना त्याचा प्रादुर्भाव झाला आहे.
जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) द्वारा कोविड -१९ ची साथीचा रोग म्हणून घोषणा करण्यात आली आहे. जगभरातील उड्डाणांचे कामकाज विस्कळीत झालं आहे. चीनमधील वुहान प्रांतात तयार झालेला हा व्हायरस सध्या सर्व जगात धुमाकूळ घालत आहे.