कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी सरकार अनेक पाऊल उचलत आहेत. विदेशी दौऱ्यावरून आलेल्या नागरिकांना १४ दिवस क्वारंटाईन राहण्यास सांगितलं जातंय. यामुळे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका टाळला जाऊ शकतो. पण खबरदारी न पाळणे आणि होम क्वारंटाइनची सूचना न ऐकणं यातून हा व्हायरस देशभरात पसरू शकतो.
याचंच उदाहरण आज मुंबईत उघडकीस आलं. जर्मनीहून आलेले चार जण क्वारंटाइनचा सल्ला असूनदेखील चक्क गर्दीच्या आणि AC ट्रेनमध्ये बसून प्रवास करताना आढळले. हातावर मारलेल्या स्टँपमुळे त्यांना ओळखून वेगळं करण्यात आलं.
परदेशातून येणाऱ्या सर्वांची विमानतळावरच तपासणी करण्यात येत आहे. त्यांना किमान १४ दिवस गर्दीत न मिसळता क्वारंटाइन करून घेण्याचा सल्ला दिला जात आहे. विलगीकरणाचा सल्ला दिलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या हातावर एअरपोर्ट सोडण्यापूर्वीच स्टँप मारण्यात येत आहे. त्यांनी गर्दीत मिसळणं टाळावं, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. पण हा सल्ला काही प्रवासी अजिबात मनावर घेत नाहीत, असं दिसलं. हातावर स्टँप मारलेले चार प्रवासी गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये दिसल्यानंतर तिकीट तपासनीसानं कारवाई करत त्यांना ट्रेनमधून उतरवलं.
हे चौघेही जर्मनीमधून परतले आहेत आणि ते सुरतला निघाले होते. त्यासाठी त्यांनी गरीबरथ एक्स्प्रेस मुंबईहून पकडली. पालघर स्टेशनला तिकीट तपासनीसानं हा चौघांच्या हातावरच १४ दिवस घरात राहण्याचा स्टॅम्प बघितला आणि ट्रेनमधून उतरवलं. त्यामुळे बाकीच्यांना संभाव्य असलेला संसर्ग टळला. आता या चारही जणांना पालघरच्या जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे.
हेही वाचा