राज्यात कोरोनाचा कहर लक्षात घेता, अपुऱ्या पडणाऱ्या मनुष्यबळामुळे राज्यातील आरोग्य विभागाच्या 100% जागा भरण्याच्या निर्णयाला आता परवानगी मिळाली आहे. लॉकडाऊन काळात ही पदे भरण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र राज्य सरकारी सेवेतील अनेक पदे रिक्त झाली आहेत. ही रिक्त पदे गेली अनेक वर्षे भरली गेली नसल्याचे सांगितले जात आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांवर दिवसेंदिवस ताण वाढतच आहे. आरोग्य विभागातील अपुऱ्या मनुष्यबळामुळे हा ताण वाढला असल्याचे लक्षात आल्यानंतर आरोग्य विभागाकडून 17 हजार 337 रिक्त पदे भरण्यास राज्यसरकारकडे परवानगी मागीतली होती. त्या पार्श्वभूमिवर राज्यसरकारने 100% पदे तातडीने भरण्यास परवानगी दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ही माहिती दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही याबाबत माहिती दिल्याचे महाराष्ट्र राज्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने म्हटले आहे. दरम्यान, राज्यभरातील आरोग्य विभागातील 17 हजार 337 रिक्त पदे आणि त्यासोबतच वैद्यकीय शिक्षण विभागातील 11हजार पदे तसेच विविध महापालिकांमधील रिक्त पदे शंभर टक्के भरण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
दरम्यान, आरोग्यमंत्री टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोरोना व्हायरस संकटामुळे सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे लॉकडाऊन काळात ही पदे भरण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात येणार आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्र राज्य सरकारी सेवेतील अनेक पदे रिक्त झाली आहेत. ही रिक्त पदे गेली अनेक वर्षे भरली गेली नाहीत. त्यामुळे कोरोना सारख्या महासंकटाच्या काळात राज्य सरकारला मनुष्यबळ हव्या त्या प्रमाणात उपलब्ध होत नाही. परिणामी राज्य सरकारने नोकर भरती काढली आहे.