Advertisement

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रालाच लस कमी का?, राजेश टोपेंनी आकडेवारीच काढली

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील लशींच्या पुरवठ्याची स्थिती सांगितली.

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रालाच लस कमी का?, राजेश टोपेंनी आकडेवारीच काढली
SHARES

कोरोना संकटाच्या काळात कोरोना विषाणू प्रतिबंधक लशींच्या पुरवठ्यावरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा नवा वाद उभा राहिल्याचं चित्र आहे. कोरोना संसर्ग रोखण्यात आलेल्या अपयशावरून लोकांचं लक्ष वळवण्यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्राकडून लशींचा कमी पुरवठा होत असल्याचा बिनबुडाचा आरोप करत असल्याची टीका केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी केली होती. त्यासंदर्भात काही आकडेवारी सादर करत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हर्षवर्धन यांचा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न गुरूवारी केला.

आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील लशींच्या पुरवठ्याची स्थिती सांगितली. ताज्या रिलीज ऑर्डरनुसार, राज्याला एका आठवड्यासाठी केंद्राकडून फक्त ७.५ लाख लसीचे डोस मिळाले आहेत. तर उत्तर प्रदेश ४८ लाख, मध्य प्रदेश ४० लाख, गुजरातला ३० लाख, हरियाणाला २४ लाख अशा पद्धतीने लशीचं वाटप झालं आहे. 

हेही वाचा- महाराष्ट्र सरकारने लसीचं राजकारण बंद करावं- देवेंद्र फडणवीस

इतर राज्यांनाच जास्त का?

महाराष्ट्रात (maharashtra) सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४.५ लाख आहे. मृतांची संख्या ५७ हजार, एकूण बाधितांची संख्या ३० लाख आहे. अशी परिस्थिती असताना आम्हाला फक्त ७.५ लाख लशी का? असा प्रश्न उपस्थित करताना या ऑर्डरसंदर्भात मी तातडीने डॉ. हर्षवर्धन यांच्याशी बोललो. त्यांनी मला अधिकाऱ्यांना सूचना देऊन तातडीने दुरुस्त्या करण्याचं आश्वासन दिलं आहे. आम्ही त्या दुरुस्त्या होण्याची वाट पाहात आहोत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

लसीकरण बंद

मला कुणावर आरोप करायचे नाहीत. राज्यातले सर्व कर्मचारी, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी दिवस-रात्र मेहनत करत आहेत. पण सध्याच्या घडीला महाराष्ट्रात सातारा, सांगली, पनवेल अशा ठिकाणी लस नसल्याने लसीकरण बंद पडलं आहे. बुलढाण्यात फक्त आजच्या दिवसाचा साठा आहे. 

४० लाख डोस लागतातच

लसीकेंद्र वाढवूनही जर लसच उपलब्ध नसेल, तर देणार कशी? देशभरात ५० टक्के रुग्ण असणाऱ्या राज्याला ७.५ लाख आणि इतरांना जास्त डोस का? आम्ही सगळ्या प्रकारे लसींची मागणी केली आहे. महाराष्ट्रात आठवड्याला ४० लाख लसीचे डोस लागतातच. त्यामुळे महिन्याला १ कोटी ६० लाख डोस मिळायला हवेत. तरच राज्यातली लसीकरण मोहीम व्यवस्थित सुरू राहू शकेल, असं देखील टोपे यांनी स्पष्ट केलं.

(maharashtra health minister rajesh tope demands more covid 19 vaccine from central government)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा