
महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक सार्वत्रिक पॅलियेटिव्ह केअर (उपशामक उपचार) कार्यक्रम सुरू केला आहे.
दीर्घकालीन आणि जीवघेण्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना केवळ रुग्णालयातच नव्हे, तर घरपोच संवेदनशील उपचार मिळावेत, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
नव्या धोरणानुसार पॅलियेटिव्ह केअरला आवश्यक आरोग्य सेवा म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रे, शहरी दवाखाने ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत ही सेवा समाविष्ट केली जाणार आहे.
जिल्हा रुग्णालयांमध्ये पॅलियेटिव्ह केअर रुग्णांसाठी 4 ते 6 खाटा राखीव ठेवण्यात येणार असून, उपचारांमध्ये सातत्य राखले जाईल.
विशेष बाब म्हणजे, मॉर्फिनसारखी तीव्र वेदनाशामक औषधे आता प्राथमिक आरोग्य पातळीवर उपलब्ध असतील. यामुळे प्रशिक्षित डॉक्टरांना रुग्णांच्या घराजवळच उपचार करता येणार आहेत.
हा कार्यक्रम केवळ कर्करोगापुरता मर्यादित नसून, हृदय, मूत्रपिंड आणि फुफ्फुसांचे आजार, पक्षाघात (स्ट्रोक), पार्किन्सन्स व डिमेन्शियासारखे मेंदूविकार, वयोमानानुसार होणाऱ्या दीर्घकालीन वेदना, बालरोग तसेच दीर्घकालीन मानसिक आजार यांचाही समावेश यात करण्यात आला आहे.
या उपक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे “हॉस्पिटल टू होम्स” (रुग्णालयातून घरापर्यंत) हे मॉडेल.
याअंतर्गत डॉक्टर, परिचारिका, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका आणि समुपदेशक यांचा समावेश असलेली बहुवैद्यकीय टीम रुग्णांना घरपोच उपचार देणार आहे. गरजेनुसार रुग्णांना नियमित भेटी, वैद्यकीय मदत, समुपदेशन आणि काळजीवाहकांसाठी मार्गदर्शन दिले जाणार आहे.
या धोरणात कुटुंबीयांसाठी शोक-समुपदेशन, टेलिकन्सल्टेशन सेवा, आपत्कालीन रुग्णवाहिका सेवांशी समन्वय आणि मानसिक आरोग्य हेल्पलाईन यांचाही समावेश असून, सर्वांगीण काळजी देण्यावर भर देण्यात आला आहे.
राज्य सरकार समुदाय स्वयंसेवक, स्थानिक संस्था आणि CSR भागीदारांनाही सहभागी करून घेणार असून, शासकीय सेवांसोबत लोकसहभागातून मजबूत आधारव्यवस्था उभारण्याचा मानस आहे.
या कार्यक्रमासाठी निधी राष्ट्रीय आरोग्य योजनांतर्गत दिला जाणार असून, प्रभावी अंमलबजावणीसाठी नियमित देखरेख केली जाणार आहे.
