Advertisement

विक्रोळीत गवतामुळे वाढतोय डासांचा प्रार्दुभाव


विक्रोळीत गवतामुळे वाढतोय डासांचा प्रार्दुभाव
SHARES

मुंबईत उन्हाचा पारा वाढलेला असतानाच विक्रोळीकर मात्र, डासांमुळे त्रस्त आहेत. पावसाळ्यापूर्वीच डासांनी विक्रोळीकरांवर हल्ला चढवल्यामुळे त्यांचे जगणेच मुश्कील झाले आहे. विक्रोळीतील टागोर नगरच्या आसपास कोणताही नाला नाही की, पाणी साचण्याची ठिकाणे नाहीत. तरीही डासांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला असून, गायी आणि म्हशींकरता आवश्यक असलेले गवत पिकवण्यासाठी केल्या जाणाऱ्या शेतीमुळेच या डासांचा प्रार्दुभाव वाढत असल्याची बाब समोर आली आहे.

पावसाळा आला की डेंग्यू आणि मलेरियाच्या आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होते. पावसाळ्यात डासांमुळे होणाऱ्या आजारांचा सामना करणाऱ्या जनतेला पावसाळ्यापूर्वीच डासांचा सामना करावा लागत आहे. विक्रोळीतील टागोरनगर, भारतनगर, गोदरेज कॉलनी, आयसीआयसीआय आदी भागांमधील जनतेची झोप डासांनी हराम करून टाकली आहे. डासांचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी नियमित धूर फवारणी तसेच औषधांची फवारणी केली जात असली तरीही डासांचा त्रास काही केल्या कमी होताना दिसत नाही.

मात्र, या वाढत्या डासांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, टागोरनगर आणि हरियाली व्हिलेजचे प्रवेशद्वार असलेल्या पूर्व द्रुतगती महामार्गाच्या नजिकचा परिसर आहे. या मोकळ्या जागेत गवत पिकवले जात असून, या हिरवळीचा पट्टा डोळ्याला समाधान देणारा असला तरी प्रत्यक्षात डासांचाच अड्डा बनला असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी गणेश शेट्टी यांनी केला आहे. हे गवत पिकवण्यासाठी सांडपाणी आणि मलयुक्त पाणी साठवून वापरले जात आहे. या पाण्याचा वापर केल्यामुळे गवत चांगल्या प्रकारे पिकते. परंतु यामुळेच डासांचा त्रास आसपासच्या नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. 

याबाबत आपण महापालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये तक्रारी करूनही प्रशासनातील अधिकारी लक्ष देत नाहीत, त्यामुळे आपण याबाबत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आयुक्त तरी अनधिकृत गवत पिकवणाऱ्यांना डास प्रतिबंधक उपाययोजना राबवण्याचे निर्देश देवून कारवाई करतात हेच पाहायचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. सध्या गवत पिकवली जाणारी जागा ही एस.टी स्टँडसाठी राखीव आहे. परंतु त्यावर एस.टी स्टँड बनवला जात नसल्यामुळे बाहेरच्या लोकांकडून या जागेचा गवत पिकवण्यासाठी अनधिकृत वापर होत असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे. स्थानिकांचे जर तसे म्हणणे असेल तर त्या भागाची पाहणी करून तिथे औषध फवारणी करून पुढील कार्यवाही केली जाईल, असे किटकनाशक विभागाचे प्रमुख अधिकारी राजन नारिंग्रेकर यांनी स्पष्ट केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा