दिवाळी म्हटलं की गोड पदार्थ, बेसणाचे लाडू, तेलात भाजलेला पोह्यांचा चिवडा, शंकरपाळी, मिठाई असे सर्वच प्रकार येतात. पण, हे सर्व पदार्थ प्रमाणाच्या बाहेर खाल्ले तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. विशेषत: डायबेटिज म्हणजेच मधुमेह असणाऱ्यांनी तर दिवाळीत आपल्या शरीराची काळजी घेतलीच पाहिजे. पण, थोडेसे सवयींमध्ये बदल केले, तर सर्व सण आपण आनंदात साजरे करु शकतो.
व्यायामाचा अभाव आणि अनारोग्यदायी अरबट-चरबट (जंक फूड) खाण्याचं प्रचंड प्रमाण, यामुळे भारतात मधुमेहाचं प्रमाण वाढत आहे. 62.4 दशलक्ष रूग्णांसह भारतात मधुमेहाचं सर्वाधिक प्रमाण आहे. हे प्रमाण केवळ शहरी भागातच वाढत आहे, असं नाही, तर ग्रामीण भागातील लोकसंख्येलाही त्याने ग्रासले आहे. त्यामुळे या काळात अन्नाचं सेवन करताना साखर आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण लक्षात घ्यावं, असा सल्ला डॉक्टर्स देतात.
दिवाळी असो किंवा कोणताही सण असो, मधुमेह असणाऱ्यांनी साखर, मैदा, गोड पदार्थ, मीठ आणि तेल या पाच प्रकारांचं जास्त सेवन करणं टाळावं, असा सल्ला मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे यांनी दिला आहे.
फक्त मधुमेहींनीच नाही, तर गर्भवती महिला किंवा संपूर्ण कुटुंबियांनी ‘सुक्रालोस’पासून बनवलेले गोड पदार्थ खावेत आणि ते ही मर्यादित, असा सल्ला ही डॉ. गाडगे यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिला आहे.
हेही वाचा