Advertisement

नगरसेवक करणार टीबीविषयी जनजागृती


नगरसेवक करणार टीबीविषयी जनजागृती
SHARES

क्षयरोगा (टीबी)चे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने या आजाराची तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे मंगळवारी लोकप्रतिनिंधीसाठी ‘मुंबई मिशन फॉर टीबी कंट्रोल’ या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेत नगरसेवकांना टीबीमुक्त भारत करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील, यावर मार्गदर्शन करण्यात आलं. 

या कार्यशाळेत टीबी म्हणजे काय? त्याची लक्षणे काय आहेत? त्यावर काय उपचार करता येतील? अशा अनेक विषयांवर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आलं. कार्यक्रमात टीबीविषयी काही चित्रफिती दाखवण्यात आल्या. या मार्गदर्शनानंतर नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागात जाऊन टीबीसंदर्भातील इत्थंभूत माहिती रहिवाशांना देतील.

या कार्यशाळेत महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता, उपायुक्त सुनील धामणे, केईएमचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे, महापालिकेच्या कार्यकारी वैद्यकीय अधिकारी डॉ. पद्मजा केसकर उपस्थित होत्या. 

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना आंतरराष्ट्रीय ‘द युनियन’ या संस्थेचे संचालक इम्रान सय्यद यांनी महत्त्वाच्या विषयावर प्रकाशझोत टाकला.


टीबीचं प्रमाण एचआयव्हीपेक्षा झपाट्याने वाढत आहे. प्रत्येक वर्षी टीबीमुळे जगातील जवळपास १८ लाख रूग्ण दगावतात. तर, भारतात ही संख्या ४.३० लाख इतकी आहे. तर, २०५० मध्ये वर्षात मृत्यू टोल ७ कोटी पर्यंत जाईल. शिवाय, दरवर्षी भारतात २७ लाख ९० हजार नवीन टीबीचे रुग्ण दाखल होतात. त्यात एमडीआर आणि एक्सडीआर टीबी असणाऱ्या रुग्णांचं जास्त आहे.

- इम्रान सय्यद, संचालक, ‘द युनियन’ संस्था


शिवाय, टीबी हा असा आजार आहे की तो कोणाला, कधीही होऊ शकतो. त्यातही १५ ते ४४ वयोगटातील लोकांना टीबी होण्याचं प्रमाण जास्त आहे. म्हणून आजही मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात याविषयी जनजागृती करणं महत्त्वाचं असल्याचंही सय्यद यांनी सांगितलं. तसंच उपाययोजना म्हणून शिवडी टीबी रुग्णालयासारखी आणखी रुग्णालये बांधावीत जेणेकरुन उपचार मिळणं आणखी सोपं होईल, अशी मागणीही त्यांनी केली.


झोपडपट्टीत टीबीचे रुग्ण

मुंबईतील ५० टक्के परिसर हा झोपडपट्टीने व्यापलेला आहे. त्यातील मानखुर्द, धारावी, मालवणी या परिसरात क्षयरोगाच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आल्याचे केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितलं.

टीबीवर उपचार करण्यासाठी महापालिकेने विविध सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ३०० हून अधिक डॉट्स केंद्र आहेत. याशिवाय सीबीनॅट मशिन पूर्वी १ मशीन होती. पण २०१७ मध्ये २८ मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवाय, पालिका प्रशासन, वैद्यकीय दाता आणि भागीदार यांच्यातर्फे २३३ क्षयरूग्णांना पौष्टीक आहार देण्यात आला आहे.

- डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता,केईएम रुग्णालय

तसंच, ९९ नंबर ही देण्यात आला आहे. जर एखाद्या रुग्णाने औषध घेतले तर ते डॉक्टरांना कळावं म्हणून ९९ या नंबरवर रुग्णांना फक्त मिस्ड कॉल द्यायचा आहे. म्हणजे सतत त्या रुग्णाचा पाठपुरावा करण्यास सोपं जातं.


मुंबईत क्षयरूग्णांची संख्या वाढत आहे. झोपडपट्टीत हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे नगरसेवकांनी आपआपल्या प्रभागात क्षयरोगाबाबत जागरूकता निर्माण करावी. कारण नगरसेवकाला त्याच्या प्रभागातील व्यक्तींबद्दल माहिती असते. त्यामुळे त्याने ही माहिती आपल्या प्रभागात देणं गरजेचं आहे.

-प्रा. विश्वनाथ महाडेश्वर, महापौर, मुंबई

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा