राज्याचे नवे गृहनिर्माण धोरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते. मुंबई शहरातील जुन्या-मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लावण्याबरोबरच म्हाडा वसाहतींचा रेंगाळलेला प्रश्नही नव्या धोरणांतर्गत मार्गी लावण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुंबईतल्या प्रत्येक नागरिकाला स्वस्तात हक्काचे घर देण्याच्यादृष्टीने हे धोरण तयार करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. शिवसेना आणि भाजपने आगामी पालिका निवडणुका लक्षात घेऊन हे धोरण जाहीर केले अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. सर्वसामान्यांना हक्काची घरे देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकही योजना राबवली नसल्याची टीकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.