रायगड जिल्ह्यातील महाड शहरात ५ मजली निवासी इमारत सोमवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली तब्बल १५० ते १७५ रहिवासी अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनानं मदत कार्य सुरू केलं असून, २५ जखमींना आतापर्यंत ढिगाऱ्याखालून काढण्यात आलं आहे. या मदतकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची ३ पथके पुण्याहून महाडकडे रवाना झाली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाडच्या काजळपुरा भागात ‘तारीक गार्डन’ नावाची ही इमारत होती. संध्याकाळी ७ च्या सुमारास इमारत अचानक कोसळली. इमारतत कोसळल्याचा आवाज आल्याने इमारतीतील १० ते १५ लोक जीव मुठीत घेऊन घराबाहेर पळाल्याने त्यांचा जीव वाचला. परंतु इतर सुमारे १५० ते १७५ रहिवासी इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
इमारत कोसळल्यानंतर परिसरात प्रचंड धूर झाल्याने आजूबाजूच्या रहिवाशांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी कोसळलेल्या इमारतीचा प्रचंड ढिगारा दिसला तसंच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रहिवाशांचे आवाज आल्याने स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरु केलं. तोपर्यंत अग्निशमन दल आणि बचाव पथकाच्या चार टीमने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्याला सुरूवात केली. जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मानगांव विभाग, श्रीवर्धन विभाग येथून अतिरिक्त कुमकही बोलावण्यात आली आहे.
अंधार पडू लागल्याने मदतकार्यात अडथळा निर्माण होत आहे. महाडमध्ये पाऊस सध्या तरी थांबलेला आहे. परंतु पाऊस सुरू झाल्यास मदतकार्य करणं कठीण होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.