भिवंडी-कल्याण-शिळफाटा या मार्गाचं काम पूर्ण झालं असून, त्याच्या दुसऱ्या टप्प्याचं काम अजूनही हाती घेण्यात आलेलं नाही. दरम्यान, दुसऱ्या टप्प्याचं काम वगळण्यावर कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. आमदार जगन्नाथ शिंदे आणि आमदार निरंजन डावखरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला शिंदे यांनी उत्तर दिले.
भिवंडी कल्याण शिळ मार्ग पूर्ण झाला असून, भिवंडी कल्याण शिळच्या दुसऱ्या टप्प्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडी) अजूनही हाती घेण्यात आलेलं नाही. दरम्यान, मार्गाचा दुसरा टप्पा वगळण्यासाठी १३ जून रोजी मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. यानंतर सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या दृष्टीने विभागामार्फत कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. दुसऱ्या टप्प्याची सर्व कामे एमएमआरडीमार्फत करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितले.
शिळफाटा ते भिवंडी या रस्त्याच्या नव्या ६ पदरीककरणाच्या कामाला शासनाने प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहितीही शिंदे यांनी यावेळी दिली. तसेच या कामाला दोन वर्षांचा कालावधी लागणार असून, निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रस्त्यासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रियाही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.